शहरात कार्यालयच नाही
उल्लेखनीय बाब अशी की, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे, परंतु पिंपरी-चिंचवड शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालयच नाही. या कार्यालयासंबंधित कामासाठी पुण्यात जावे लागते. पुण्यात असलेल्या कार्यालयातही अतिशय कमी मनुष्यबळ आहे. खूप मोठा विस्तार आणि अत्यल्प मनुष्यबळ असल्याने नियमितपणे मोहीम राबवणे अशक्य आहे. याचाच गैरफायदा व्यावसायिकांकडून घेतला जात आहे.
पिंपरी – शहरातील रोज हजारो नागरिक रस्त्यालगतच्या हातगाडीवर तयार केलेल्या खाद्यपदार्थ खातात. मात्र, उघड्यावर तयार केलेले अन्नपदार्थ तयार करताना सुरक्षिततेचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. यामुळे, ठिकठिकाणी दर्जाहिन तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री सरार्सपणे केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दर्जाहिन अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यवसायिकांवर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईस टाळाटाळ करत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांकडून संबंधित विक्रेत्यांविरुद्ध तक्रार येण्याची वाट पाहत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शहरात तपासणी मोहीम राबवण्यात आलेली नसल्याने खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कुणाचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील हॉटेल व्यावसायिक, हातगाडीधारक उघड्यावर दर्जाहिन खाद्यपदार्थ तयार करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छ पाण्याचा वापर तसेच खाद्य तेलाचा सर्रासपणे पुन:र्वापर करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत. याच तेलांमध्ये भजी, वडे, सामोसे, पुऱ्या यासारखे पदार्थ तळून त्यांची विक्री केली जाते. परंतु, अशा तेलात तळलेले खाद्यपदार्थ शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवत असल्याने पोटाचे आणि किडनीचे आजारही बळावत आहेत.
एखाद्या व्यावसायिकाकडून नियमानुसार खाद्य पदार्थांची विक्री न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. खाद्यपदार्थ तयार करताना हातगाडीधारक व व्यावसायिकांनी निकषांचे पालन करावे. शहरात काही ठिकाणी दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री केल्यास ग्राहकांनी अन्न व औषध विभागाकडे तक्रार करावी.
संजय नारगुडे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग