सरकारकडून बक्षिसा ऐवजी शास्त्रज्ञांना शिक्षा
नवी दिल्ली- भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चांद्रयान 2’ या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना बक्षिस देण्याऐवजी केंद्र सरकारने त्यांचा पगार कपात करत जणू शिक्षाच केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने 12 जून 2019 रोजी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 1996 पासून मिळणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता 1 जुलै 2019 पासून बंद करण्यात आला आहे. या आदेशानंतर डी, ई, एफ आणि जी श्रेणीतील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संना हा भत्ता मिळणार नाही.
इस्रोमध्ये जवळपास 16 हजार शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स आहेत. त्यामुळे या आदेशानंतर जवळपास 85 ते 90 टक्के शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संच्या पगारात दरमहा 8 ते 10 हजारांची कपात होईल. सरकारच्या या आदेशामुळे इस्रो नाराज असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, केंद्र सरकारने इस्रोतील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संना प्रोत्साहन म्हणून 1996 पासून हा भत्ता लागू केला होता. इस्रोतील कामाप्रती त्यांची तळमळ अधिक वाढावी आणि संस्था सोडून इतरत्र नोकरीसाठी जाऊ नये हा उद्देश हा भत्ता वाढविण्यामागे होता.