सातारा – यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत विज्ञान शाखेचा कट ऑफ साधारण नव्वद टक्क्यांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीएसई व आयसीएसई च्या तुलनेत राज्य महामंडळाच्या विद्यार्थ्यांची मेरिट फाईट वाढली आहे. वाणिज्य व कला शाखेला कमी अधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी व उपलब्ध जागांचा कोटा यांच्या व्यस्त प्रमाणाची अडचण होण्याची शक्यता आहे. मात्र जागांचा कोटा पाच ते आठ टक्के वाढवला जाईल असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. शालेय आयुष्य संपवून महाविद्यालयात भविष्यातील स्वप्ने रंगवणाऱ्या विद्यार्थ्यांनी यंदाही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे जाण्याचा मार्ग चोखळला असल्याचे चित्र दिसत आहे. नोकरीची संधी आणि तेथील स्पर्धा लक्षात घेऊन उत्तम गुण मिळविणाऱ्यांच्या डोक्यात स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट असले तरी प्रवेश मात्र विज्ञान शाखेकडे घेण्याचा कल दिसतोय. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध विद्यार्थ्यांना लागले आहेत. जिल्ह्यातील 714 माध्यमिक शाळेतील सुमारे 42 हजार 920 विद्यार्थ्यांनी 115 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली. यातील 42 हजार 630 विद्यार्थी परीक्षेस बसले आणि 36 हजार 761 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातून पुन:प्रविष्ट विद्यार्थ्यांची नोंदणी 1 हजार 110 झाली होती.
यंदाचा निकाल लक्षात घेता नव्वद टक्क्यांच्यावर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मुलांच्या डोक्यात स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट असले तरी कुटुंबियांचा कल मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सत्तर ते ऐंशी टक्के गुण मिळविले आहेत त्यांनी वाणिज्य आणि विज्ञान या दोन पैकी एका शाखेकडे जाण्याचा विचार करत आहेत. तर सत्तर पेक्षा कमी गुण असलेली मुलं कला शाखेबरोबरच, आयटीआय, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट यासारखे अल्पावधीचा कोर्स करण्याच्या विचारात आहेत.
विज्ञान शाखेचं मेरिट वाढणार..!
गेल्या अनेक वर्षांपासून दहावीत 90 टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी थेट विज्ञान शाखेकडेच गेले आहेत. बारावीनंतर कोणी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या वाटा चोखाळल्या आहेत. शहरात असलेली महाविद्यालये आणि यंदा 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील दरी मोठी आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा विज्ञान शाखेचं मेरिट वाढणार आहे. यंदाही 95 किंवा 96 टक्क्यांपर्यंत मेरिट जाईल, असा कयास शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
कला शाखेकडे वाढतोय कल!
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यासक्रम आणि अभ्यासासाठी मिळणारा अमाप वेळ लक्षात घेऊन काहींनी विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे दुर्लक्ष करत कला शाखेचा मार्ग चोखाळला आहे. अकरावीपासूनच अभ्यासाची तयारी करणाऱ्या या हुशार विद्यार्थ्यांनी कला शाखेकडे प्रवेश करण्याचे निश्चित केले असल्याने 95 टक्के पडणारे विद्यार्थीही कला शाखेकडे वळण्याची शक्यता अधिक आहे.
वाणिज्य शाखेला यंदाही “अच्छे दिन’
आर्थिक क्षेत्राशी संलग्न असलेल्या वाणिज्य शाखेकडे जाण्यास यंदाही विद्यार्थी इच्छुक आहेत. बॅंकेबरोबरच खासगी ठिकाणी उपलब्ध असलेल्या नोकरी, मनुष्यबळ, मार्केटिंग क्षेत्रात असणाऱ्या वाढत्या संधी यांचा ऊहापोह करून काही विद्यार्थ्यांनी ठरवून वाणिज्य शाखेची निवड केली आहे.