-चंद्रभागेला भक्तीचा महापूर
-पालखी सोहळे पंढरीत दाखल
सूर्यकांत आसबे
सोलापूर – या भावनेतून सावळ्या विठुरायाच्या आढीने आणि आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यात सहभागासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल होत आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरीनगरीत भक्तीचा महापूर ओसंडून वाहत आहे.
वीस दिवसांपासून सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे सायंकाळी पंढरीत दाखल झाले आहेत. यात्रेसाठी येथे आधीच दाखल विविध संतांच्या लहान, मोठ्या पालख्या, दिंड्या दशमीच्या दिवशी पंढरीच्या सीमेवर वाखरी येथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी जातात.
बुधवारी, आषाढ शुध्द नवमीला सायंकाळपर्यंत रेल्वे, एसटी, खासगी वाहनांनी भाविक येथे दाखल झाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचे आषाढ शुध्द दशमी, गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले. यात सहभागासाठी येथे दाखल भाविकांमुळे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेडपुढे स्वेरी महाविद्यालयापर्यंत गेली होती. दर्शनासाठी 12 तासांचा कालावधी लागत होता. स्टेशन रस्त्याला शहरातील इतर रस्ते जेथे मिळतात तेथे पोलिसांनी सुरक्षा कठडे उभारून आतील रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे.