मुंबई : केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय यांच्यामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येते. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.
गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी अर्ज करणारा खेळाडू हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. खेळाडूने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशिन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळ प्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
विविध स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त/गुणवंत खेळाडूस नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पेन्शन ३० वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडापासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झालेले असणे आवश्यक आहे. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धाकरिता सदरची योजना लागू राहणार आहे.
याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव/संचालक क्रीडा व युवक सेवा यांची स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons
राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.