सातारा – स्वच्छ आणि सुंदर साताऱ्यात सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांच्या गप्पा सुरु असताना प्रत्यक्षात सातारकरांच्या वाट्याला खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. रस्ते विकास अनुदान व वित्त आयोगाच्या थेट अनुदानातून तब्बल साडे तीन कोटी रुपयांचे रस्ते मनोमिलनाच्या काळात झाले होते. मात्र “नवी विटी नवे राज्य’ या धोरणानुसार पुन्हा राजपथ, कर्मवीर पथ आणि राधिका रोड या रस्त्यांचे भविष्य पालिकेने ठेकेदारांच्या हाती सोपवले आहे. मात्र साताऱ्यात आषाढ सरींमध्ये रस्त्यावर खड्ड्यांचेच साम्राज्य आहे.
सातारा नगरपालिकेने चार वर्षापूर्वी 32 कोटी रूपये खर्च करून शहरातील 65 रस्ते तयार केले होते. मात्र, दीडशे कोटीचे कॉंक्रिटीकरणाची स्वप्ने पाहणाऱ्या सातारा पालिकेचे सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. एकाच पावसाळ्यात या रस्त्यांचा दर्जा समोर येऊ लागला आहे. शहरात सर्व ठिकाणी खड्डेच खड्डे दिसत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त असतानाही पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील असा एकही रस्ता राहिला नाही की ज्या रस्त्यावर खड्डा नाही. वाहनधारक आणि नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचल्याने किरकोळ अपघात आणि भांडणाचे प्रकार घडत आहेत. सर्वच ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनाचे सर्व पार्ट सुटे होत असून नागरिकांना मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी थेट नगराध्यक्ष माधवी कदम यांनी ठोस भूमिका घेऊन या त्रासातून नागरिकांना मुक्त करावे अशी मागणी होत आहे.