दिवसाकाठी होतोय सुमारे 25 हजार खर्च, मदतीसाठी प्रशासनाचा हात आखडताच
वाई – दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग आपल्याकडील पशुधन कवडीमोल दराने विकत आहे. तसेच अनेकजण ज्या जनावरांकडून कोणताही फायदा नाही अशी जनावरे कत्तलखान्याकडे पाठवत असतात तर अनेकजण सोडूनही देतात. मात्र अशा या भाकड जनावरांसाठी जैन समाजाच्यावतीने वेळे, ता. वाई याठिकाणी उभारलेले करुणा मंदिर हे मायेचा आधार ठरत आहे.
सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरे असून त्यासाठी दिवसाकाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च होत आहे. वेळे (ता. वाई) येथील करुणा मंदिर गोशाळेत भाकड गायी, बैल व सोडून देण्यात आलेल्या वासरांचा सांभाळ केला जातो. शेतकऱ्यांकडून ज्यांच्या जीवावर स्वतःचा संसार उभा केला जातो, अशा जनावरांचा उपयोग संपल्यानंतर त्याची रवानगी गोशाळेत केली जाते. अथवा कत्तल खाण्यात पाठविण्यात येतात. वाई तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांकडून कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करण्यात येऊन करुणा मंदिर गोशाळेत सोडण्यात येतात, परंतु त्यानंतर जनावरांचा सांभाळ करण्याची जबाबदारी या संस्थेवर येऊन पडते, कृषी विभागाकडून अशा शेतकऱ्यांना प्रबोधन करण्याची गरज असताना तसे होताना दिसत नाही.
या जनावरांना दररोज दहा ट्रक ओला-सुखा चारा लागत असून तो मिळविताना पैसे देऊनसुद्धा तारेवरची कसरत करावी लागते, जनावरांना पिण्यासाठी पाच लाख लिटरचे शेततळे उभारण्यात आले आहे, तसेच बोरवेलसुद्धा काढण्यात आली आहे, त्याचप्रमाणे खासगी टॅंकरचा आधार पाण्यासाठी घेतला जातो. करुणा मंदिर गोशाळेने तहसीलदारांकडे पाण्याच्या टॅंकरची मागणी केली होती. परंतु नियमात बसत नसल्याचे कारण पुढे करत ही मागणी फेटाळण्यात आली.
जनावरांचा सांभाळ करण्यासाठी एक पशुवैद्यकीय अधिकारी व दहा कामगार अशी कुमक तैनात आहे. गायींच्या गोमूत्रापासून तयार करण्यात येणारा व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
बळीराजाने शेतीबरोबर नियोजनबद्ध तांत्रिक पद्धतीने गायीपालन हा जोड व्यवसाय केल्यास आत्महत्यासारख्या घटनांना नक्कीच पायबंद बसेल. यासाठी ठोस प्रबोधन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे, अशी माहिती करुणा मंदिर संस्थेचे विश्वस्त पोपटलाल ओसवाल व दीपक ओसवाल यांनी दिली आहे.
“धनदांडग्यासाठी महसूल विभागाकडून पायघड्या घातल्या जातात. मात्र सर्वसामान्य माणसाचे काम एका फेरीत होत नाही, या विभागाची ही मानसिकता बदलण्याची आज नितांत गरज आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांना पाण्याचे टॅंकरच्या मंजुरीसाठी या विभागाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. महसूल विभाग कोणासाठी काम करतो हा सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे.
-प्रशांत डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते.