ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला एकमुखी ठराव
लोणंद – लोणंदजवळ असलेल्या खेड बुद्रुक, ता. खंडाळा येथील गावकऱ्यांनी सर्वानुमते आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तसा एकमुखी ठरावही ग्रामस्थांनी केला आहे.
धोम बलकवडी, निरा देवधरच्या हक्काच्या पाण्यासाठीचा हा लढा खेड बु. ग्रामस्थांनी आता निकराने लढायचा ठरविले आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सदर प्रकल्पग्रस्तांसाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. मात्र असे असूनही या योजनेच्या लाभ क्षेत्रात असलेल्या खेड बुद्रुकला धोम बलकवडीचे पाणी मिळाले नाही. सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. या पार्श्वभूमीवर त्रस्त शेतकऱ्यांनी चालू आवर्तनाचे पाणी तुळशी वृंदावन या धरणामध्ये सोडावे अशी मागणी केली आहे. अन्यथा मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी खेड बुद्रुक ग्रामस्थांनी केलेल्या ठरावाच्या प्रती सहायक पोलीस निरीक्षक लोणंद, तहसीलदार खंडाळा, जिल्हाधिकारी सातारा, राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोग यांना ठरावाच्या प्रती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी ऍड. वैभव धायगुडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनिल रासकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश धायगुडे पाटील व इतर मान्यवरांची भाषणे झाली. तसेच खेड बुद्रुक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.