दिल्लीत 24 जूनला होणार सन्मान
पाचगणी – स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून जिल्ह्याचा दिल्ली दरबारी 24 जून रोजी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीच्या गावकारभाऱ्यांना निमंत्रित केले आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने 1 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान संपूर्ण देशात झालेल्या या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम 24 जून रोजी होत आहे. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पेयजल व स्वच्छता विभागाचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्याबरोबर जिल्ह्यातील शिंदेवाडीच्या (ता. जावळी) सरपंच सौ. धनश्री सुनील शिंदे, धनगरवाडीचे (ता. खंडाळा) सरपंच चंद्रकांत आप्पासाहब पाचे, बनवडीचे (ता. कराड) स्वच्छतादूत शंकर मारुती खापे, मठाचीवाडीचे (ता. फलटण) स्वच्छतादूत संदीप अप्पासाहेब एखंडे, मान्याचीवाडीचे (ता. पाटण) आदर्श सरपंच रवींद्र आनंदराव माने या प्रतिनिधींना दिल्लीच्या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले आहे.
शिंदेवाडीच्या सरपंच सौ. धनश्री शिंदे यांनी सरपंचपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. जलव्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता याबरोबरच तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीने निर्मलग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अशी विविध पारितोषिके पटकावली आहेत