लंडन : भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत भरात असलेल्या भारतीय संघाला एका खराब खेळीची किंमत स्पर्धेतून बाहेर होत चुकवावी लागली. याबाबात भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘भारतीय संघ फक्त रोहित शर्मा व कोहली या दोन-तीन खेळाडूंवरच अवलंबून राहिला ही मोठी चूक झाली. संघाला विजयी करण्याची जबाबदारी या दोन खेळाडूंवरच नसून अन्य फलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची गरज होती. विजयाचे लक्ष्य आपल्या आवाक्यात होते. मात्र, त्याकडे आपण सकारात्मक वृत्तीनेच पाहण्याची आवश्यकता होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने कुशलतेने आपल्या गोलंदाजांचा उपयोग केला. त्याला क्षेत्ररक्षकांनी दिलेली साथही प्रशंसनीय होती’.