बेळगाव – येथे होत असलेल्या भारत अ आणि श्रीलंक अ संघांदरम्यानच्या एकदिवसईय सामन्यात महाराष्ट्राचा उदयोन्मुख खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघाने श्रीलंका अ संघाचा 48 धावांनी पराभव केला आहे. यावेळी ऋतुराजने 136 चेंडूत नाबाद 187 धावा केल्या. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारत अ संघाने 317 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेचा संघ 269 धावांपर्यंत मजल मारु शकला.
सलामीवीर शुभमन गिल माघारी परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडने अनमोलप्रीत सिंह आणि इशान किशन यांच्यासोबत महत्वाच्या भागीदारी रचल्या. ऋतुराजने श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यावेळी श्रीलंकेकडून लहिरु कुमाराने 3 तर अशन प्रियंजनने 1 बळी घेतला.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या श्रीलंका अ संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर निरोशन डिकवेला आणि सदिरा समरविक्रमा हे ठराविक अंतराने माघारी परतले. मधल्या फळीत भनुका राजपक्षे आणि सेहन जयसुर्या यांनी भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली. जयसूर्याने 108 धावांची नाबाद शतकी खेळी केली. मधल्या फळीत दसुन शनका आणि इतर फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारताकडून मयांक मार्कंडने 2 बळी घेतले. त्याला तुषार देशपांडे, संदीप वारियर, शिवम दुबे आणि दिपक हुडा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.