सोलापूर, (प्रतिनिधी) – सोलापूरचा होटगी रोड विमानतळ विकसित होण्यास रन वे कमी पडतो आहे. शहराच्या विकासासाठी विमानतळ सुरू होणे गरजेचे आहेच, असे मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रकाश आंबेडकर शहरात विविध ठिकाणी मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांशी संपर्क साधत होते. यावेळी विमानतळाचा मुद्दा सांगितला असता ते म्हणले, विमानतळ सुरू होण्यासाठी मूलभूत तांत्रिक मुद्दे पहावे लागतात. साखर कारखान्याची चिमणी यामुळे विमानतळाला कोणता अडथळा येतो असे मला वाटत नाही. मी या निवडणूक निमित्ताने तीन चार वेळा या विमानतळावर आलो आहे.
येथील रन वे मात्र थोड्या मोठ्या विमानांसाठी कमी वाटतो. इच्छाशक्ती असेल तर या विमानतळावर इतर नजीकच्या शहरांसाठीची विमानसेवा सुरू होऊ शकते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ सुरू होण्यास प्रयत्न झाले पाहिजेत. सोलापूर शहरातील यंत्रमाग व्यवसाय तसेच या अनुषंगानं सुरू असलेले व्यवसाय अधिक विकसित व्हावेत, या दृष्टीने व्यापाऱ्यांनी प्रयत्न सुरू करताना आपली स्पर्धा चीनच्या बाजारपेठेशी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.