कोळगाव – श्रीगोंदा व शिरुर तालुक्यातील दाणेवाडी येथील घोडनदीच्या पात्रात अनाधिकृतपणे, विनापरवाना चोरून वाळूउपसा करणाऱ्यांवर बेलवंडी पोलिसांनी बुधवारी (दि.10) रात्री छापा टाकून सुमारे 56 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाळूचोरी करणारे चालक-मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी (दि.10) रात्री बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना गुप्त माहिती मिळाली की, श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील घोड नदीच्या पात्रात काहीजण जेसीबीच्या सहाय्याने वाळूउपसा करून वाहतूक करीत आहेत, अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद माने हे त्यांच्या 4-5 कर्मचाऱ्यांसह नदी पात्रात जाऊन वाळुउपसा होत असल्याची खात्री करून घेतली. अंधारात सापळा रचून वाळू वाहतूक करत असलेले 56 लाख, 36 हजार रुपये किमतीचे 6 ट्रक जागीच पकडले.
पकडलेले ट्रक व त्यांतील वाळूसह पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आले. बेलवंडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी कचरु विक्रम गायकवाड (रा. रामलिंग, शिरुर), ज्ञानदेव नामदेव विटकर (रा. बाबूरावनगर, शिरुर), गणेश सांगळे (रा. तर्डोबाचीवाडी, शिरुर), संतोष नंदू वाळके (रा. बाभुळसर, शिरुर), शाम धोंडीबा राठोड (रा. तर्डोबाचीवाडी, शिरुर), सतिश साबळे (रा. शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई कर्जत पोलीस उपधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस कर्मचारी नंदकुमार पठारे आदिंनी केली.