या वर्षी सहा हजार तीनशे हेक्टरच्या ऊसनोंदी : पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
टाकळी हाजी -शिरुर तालुक्यातील रावडेवाडी येथील पराग ऍग्रो कारखान्यात रोलर पुजनाचा कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके यांच्या हस्ते करून शुभारंभ करण्यात आला. कारखान्याने 2019- 2020 या कालावधीतील गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने कारखान्यातील सर्व मशिनरींच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी तीव्र दुष्काळ पडल्याने गेल्या लागवड हंगामात ऊस लागवडीचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. यंदा दुष्काळाच्या तीव्रतेमुळे निम्म्यापेक्षा अधिक कारखाने बंद राहण्याची शक्यता आहे. ठराविक कारखानेच सुरू होण्याची शक्यता आहे. पराग ऍग्रो कारखान्याने जिल्ह्यात प्रथमच रोलर पूजन करून गाळप हंगामाची जोरदार तयारी चालू केली आहे.
यावर्षी पराग कारखाना राहूरी, नेवासा, दौंड, श्रीगोंदा, खेड, जुन्नर, पारनेर, शिरुर तालुक्यातून ऊस गाळपासाठी आणणार आहे. त्यादृष्टीने कारखान्याने संबंधित विभागात गटकार्यालय सुरू करण्यासाठी नियोजन केले आहे. पराग कारखान्याकडे गाळप हंगाम 2019- 20 साठी सहा हजार तीनशे हेक्टरच्या ऊसनोंदी झाल्या आहेत. पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. अंदाजे 10 जुलैपासून ऊस तोडणी व वाहतुकीचे करार सुरू होणार असल्याची माहिती मुख्य शेतकी अधिकारी अंकुश आढाव यांनी दिली.
यावेळी चिफ इंजिनियर अशोक चोरगे, फायनान्स मॅंनेजर ज्ञानेश्वर वाबळे, चिफ केमिस्ट एस. एम. जाधव, सुरक्षा अधिकारी आर. एम. कुरवडे, कामगार कल्याण अधिकारी के. डी. नेवसे, आण्णासाहेब लबडे, सिव्हिल इंजिनियर ए. एन. गोडसे, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक प्रतिनिधी डी. पी. चव्हाण, ऊस उत्पादक शेतकरी गबाजी पिंगट आदी मान्यवर व अधिकारी व कामगार उपस्थित होते.