हैदराबाद – सामन्याच्या वेळी असलेली समयसुचकता आणि परिस्थीतीचे ज्ञान या दोन गोष्टींमुळे रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन्ही खेळाडू कर्णधार म्हणुन अव्वल आहेत असे विधान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले आहे.
यावेळी पुढे बोलताना सचिन म्हणाला की, धोनीचे रणनीती ज्ञान सर्वांनाच माहीत आहे. मात्र, आता रोहितनेही मागील अनेक वर्षांत ते आत्मसात केले आहे. त्याने आयपीएलचे चार जेतेपद पटकावली आहेत आणि भारतीय संघात उपकर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली ठरत आहे. रोहित आणि धोनी हे दोघेही चतुर आहेत. गेली अनेक वर्ष धोनी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे आणि रोहितनेही आयपीएल असो वा बदली कर्णधार म्हणून अविश्वसनीय यश प्राप्त केले आहे. सामन्याचा कल ओळखणे आणि परिस्थितीनुसार नियोजन करण्याची क्षमता त्यांना खास ठरवते. सामन्याची परिस्थिती ओळखण्याचे धोनीचे कसब आपण अनेकदा अनुभवले आहे आणि आता रोहितही त्यावर खरा उतरतो आहे. हे त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये दाखवून दिले आहे.
तसेच पुढे बोलताना सचिन म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना भारतीय संघाला टी20 विश्वचषक स्पर्धा जिंकुन दिली. त्यानंतर त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत देखील भारतीय संघाला विजयी केले. त्यावेळी त्यच्यातील नेतृत्वगुण सर्वांना समजले होते. धोनीहा सामन्याच्या पहिल्या चेंडूपासुनच प्रतिस्पर्धी संघाची मानसिकता ओळखतो. त्यानुसार गोलंदाजांचे नियोजन क्षेत्ररक्षणाचे नियोजन हे तो करत असतो. त्याच्यातील नेतृत्व क्षमता ही अफाट आहे हे त्याने गत वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून पुनरागमन करताना दाखवुन दिले आहे.
तसेच सचिनने यावेळी आयपीएलमधुन पुढे येणाऱ्या नवोदित खेळाडूंच्या कामगिरीची देखील स्तुती केली असुन आयपीएलमुळे अनेक नविन खेळाडूंना आपल्यातील गुण दाखवण्याची मोठी संधी निर्माण होत आहे. यात केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजही चमकदार कामगिरी करुन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आपला धसका घ्यायला आणि त्यांच्या गोलंदाजी विरोधात रणनिती आखायला भाग पाडत आहेत. यात नवोदित दिपक चहार, राहुल चहार, प्रसिद्ध कृष्णा यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तर, फलंदाजांमध्ये इशान किशन, रियान पराग, सुर्यकुमार यादव हे फलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसुन आले आहेत असेही त्याने यावेळी सांगितले.