पिंपरी – डुडुळगाव गेल्या 22 वर्षात बरेच पालटले आहे. परिसरात लोकवस्ती वाढली. नवे-नवे गृहप्रकल्प सुरू आहेत. विकास आराखड्यातील आणि अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या काही कामांसाठी गेल्या काही महिन्यांपासून मुरूम टाकुन ठेवला आहे. मात्र, कामांचा वेग संथ आहे. हा वेग वाढविणे गरजेचे आहे. गावामध्ये कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा हा कळीचा मुद्दा आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढली आहे. ती पुरविण्यासाठी महापालिकेने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
डुडुळगावामध्ये सावतामाळी नगर, धायरकरवाडी, वहिलेनगर, तळेकर कॉलनी, डुडुळगाव गावठाण, दत्तनगर आदी प्रमुख भागांचा समावेश आहे. गावात फेरफटका मारल्यानंतर प्रामुख्याने गावातील रस्त्यांची झालेली व सुरू असलेली कामे चटकन नजरेत भरतात. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, ती सध्या अर्धवट स्थितीत आहेत. गावामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे गाव झपाट्याने नागरीकरणाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे लक्षात येते. सोसायट्यांमुळे लोकवस्ती वाढली आहे. पर्यायाने, नागरी सुविधांच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. महापालिकेकडून सध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होत आहे. हा पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी नितीन व सचिन तळेकर यांनी केली.
गावामध्ये महापालिकेची सातवीपर्यंत शाळा आहे. दहावीपर्यंत शाळा नसल्याने पुढील शिक्षणासाठी मुलांना मोशी, आळंदी येथे जावे लागते. महापालिकेचा दवाखाना नसल्याने खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. तर, गंभीर उपचारांसाठी भोसरी, आळंदी येथे जावे लागते. भाजी मंडई नसल्याने रस्त्यांवर किंवा गाळ्यांमध्ये भाजी विक्रेते बसतात. जुन्या जलवाहिन्या बदलल्या गेलेल्या नाहीत.
गावामध्ये विकासकामांसाठी 10.20 हेक्टर क्षेत्रावर 27 आरक्षणे टाकलेली आहेत. त्यातील 3.86 हेक्टर क्षेत्राचा ताबा महापालिकेला मिळाला आहे. तर, 6.34 हेक्टर क्षेत्राचा ताबा बाकी आहे. खेळाचे मैदान, कम्युनिटी सेंटर व ग्रंथालय, वाहनतळ, उद्यान, प्राथमिक शाळा, रिटेल मार्केट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे आदी प्रमुख विकासकामांच्या आरक्षणांचा त्यामध्ये समावेश आहे.
गावामध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. उद्यानाचे आरक्षण ताब्यात आले आहे. तेथे उद्यान उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. दवाखान्यासाठी महापालिकेकडे मागणी करणार आहे. गावामध्ये वाढत्या गृहनिर्माण सोसायट्यांची पाण्याची मागणी लक्षात घेता त्यांचा पाणी प्रश्न सुटावा, यासाठी पाठपुरावा करणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेची दहावीपर्यंत शाळा व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
– सुवर्णा बुर्डे, नगरसेविकागावामध्ये नव्याने झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना पाणी प्रश्न भेडसावतो आहे. तो सोडवणे आवश्यक आहे. अण्णाभाऊ साठेनगर येथील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरे मिळायला हवी. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी न काढल्याने परिसरातील नागरिकांना डासांचा उपद्रव होत आहे. येथील स्मशानभूमीची जागा अपुरी पडते आहे. पत्राशेड व अन्य सुविधा वाढविणे गरजेचे आहे.
– धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक