दलदलीतूनच नागरिकांना करावी लागते वाहतूक
नगर – पावसाळा सुरू झाला की रस्त्यात दलदल हा दरवर्षीचा अनुभव याही वर्षी नगरकरांना येत आहे. दोन तीन पावसात रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्याने वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा या चाळण झालेल्या रस्त्यांतून येजा करतांना छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात दलदलीच्या रस्त्यातूनच येजा करावी लागणार असल्याचे वृत्त यापूर्वीही दैनिक प्रभातने दिले होते.
पावसाळ्याच्या तोंडावर फेज -2 चे तसेच अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या कामांसाठी रस्ता खोदण्यात आला. त्याचबरोबर खासगी कंपन्यानी त्यांच्या केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला मात्र या कंपन्यांनी दुरुस्तीसाठी नुकसान भरपाई पोटी पैसे भरले आहेत.नव्हे रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामाचे टेंडरही काढण्यात आले आहे.मात्र मध्यंतरीच्या आचार संहितेच्या काळात ही कामे राहून गेल्याचे सांगण्यात आले.
पावसाळ्या पूर्वीच रस्त्यांचे खोदकाम केले असे नव्हेतर भर पावसाळ्यातही अगदी दोन दिवसापूर्वीच दिल्ली दरवाजाच्या वेशीतच पुन्हा रस्ता खोदण्यात आला. वास्तविक पाहता शहरात व उपनगरात पावसाची नुसती रिमझिम झाली तरी या रस्त्याच्या खड्ड्यांतून पाणी साठते पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. त्यात वाहने आदळून त्यांचे नुकसान होत आहे, सिद्धीबाग ते न्यू आर्टस अँड कॉमर्स महाविद्यालया जवळच्या रस्त्यावर तर खडी उघडी पडली आहे. त्यामुळे यारस्त्यावरून ये-जा करतांना वाहतुक खोळंबाही नित्याचाच अनुभव ठरत आहे. याशिवाय शहरातील अन्य रस्त्यांचीही अवस्था वेगळी नाही त्यात चौपाटी कारंजा, चितळे रस्त्यावरून रंगार गल्ली कडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
उपनगरातील रस्त्यांचीही अवस्था याहून वेगळी नाही तेथेही खदलेल्या रस्त्यांचे पॅचिंगची कामे झाली नाहीत मात्र तेथे मनपा प्रशासनाने खड्ड्यांमधून मातीचे भराव टाकले आहेत. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर या खड्ड्यांमधली माती वाहून ती खड्ड्या बाहेर पसरते त्यातूनजी नवी दलदल तयार होते या दलदलीतून जातांना अनेकदा वाहने घसरून अपघात होतात. मात्र आता पावसाळा संपल्या शिवाय या रस्त्यांची दुरुस्ती करणेही शक्य नसल्याने यंदाचा पावसाळा नगरकरांना दलदलीच्या रस्त्यातून जीव मुठीत धरून वाहतूक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.