नियोजनाअभावी उन्हातच थांबावे लागते ताटकळत ः झाडांचा घ्यावा लागतो आसरा
बिबवेवाडी – पुणे-सातारा रस्त्यावरील बसथांबे बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यालगत असलेल्या वृक्षांचा आसरा घ्यावा लागत आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले बसथांबे सुरू नसल्याने प्रवाशांना रस्त्याकडेला आसरा घेऊन उभे राहावे लागत आहे. सततचा वर्दळीचा रस्ता असणाऱ्या पुणे सातारा रस्त्यावरील बहुतांश ठिकाणी बस थांबे नसल्याने प्रवाशांना दररोजच त्रास सहन करावा लागत आहे. सातारा रस्ता खूपच रहदारीचा असून उपनगरीय नागरिक या रस्त्याचा वापर करतात. शहर हद्दीतील अनेक प्रवासी या मार्गावर नेहमीच थांबलेले असतात. तसेच बसने चढउतार करताना दिसतात.
सध्या बीआरटी मार्गावरील थांबे वापरले जात नसल्याने प्रवासी चौकातच बसची वाट पाहत असतात. काही ठिकाणी तर थांबाच नसल्याने चालकांकडून बस मुख्य रस्त्यातच थांबविल्या जात असल्याने प्रवासी अशा धोकादायक ठिकाणीच बसमध्ये चढतात व अनेकदा उतरताना देखील दिसतात. याच रस्त्यावर लहान-मोठी वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने बस थांबविण्यासाठी सुरक्षित जागाच उपलब्ध होत नाही. सातारा रस्त्यावर डी मार्ट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, बालाजीनगर परिसरात बसथांबा नसल्याने प्रवासी बसची वाट पाहत कोठेही थांबतात. यामुळे ऑटोरिक्षा चालकांचे फावत असून या परिसरात अनधिकृत रिक्षांची संख्या बेसुमार वाढली आहे. सोबतच पंचमी हॉटेल चौकातही अशीच स्थिती असून झाडावरच बस थांब्याची पाटी लावलेली आहे.
बीआरटी मार्गावरील बस थांबे वापरात नसल्याने पीएमपी प्रशासनाने अशा ठिकाणी तात्पुरते बस थांबे किंवा शेड उभारावेत, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. बस थांब्या अभावी उन्हात रस्त्यालगतथांबावे लागत असल्याने लहान मुले वृद्ध यांचे मात्र हाल होत आहे. बीआरटीचे काम दोन वर्षांपासून सुरू असून ते अजूनही सुरूच आहे. यामुळे आतील बस थांबे काढून बाहेर रस्त्यावर बस थांबा करण्यात आला आहे. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. या मुलभूत समस्यांकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.