पुणे – “काटा रूते कुणाला’, “सुरत पिया की’, “मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी’, “अवघे गरजे पंढरपूर’, “धाडिला राम तिने का परदेस’, “वद जाऊ कुणाला शरण’ आदी एकापेक्षा एक अजरामर गीते पुणेकरांना अनुभवता आली. यानिमित्ताने रसिकांना संगीत रंगभूमी अनुभवायला मिळाली. निमित्त होते…प्रसिद्ध गायिका जोत्स्ना भोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित “स्वरोत्सवा’चे.
सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या “स्वरोत्सवा’ला शनिवारी सुरुवात झाली. स्वरोत्सवाचे यंदाचे 12 वे वर्ष आहे.
“पंचतुंड नररुंड मालधर.. पार्वतीश आधी नमितो’ या नांदीने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर “मत्सगंधा’, “हे बंध रेशमाचे’, “मंदारमाला’, “सौभद्र’ आदी “गाजलेल्या’ संगीत नाटकांतील पदांचे सादरीकरण झाले. “नृपकन्या तव जाया’ या भैरवीने शनिवारी आयोजित केलेल्या मैफलीचा समारोप झाला.
नव्या पिढीतील गायक श्रीरंग भावे, वेदश्री ओक आणि अनुजा झोकरकर यांनी ही नाट्यगीते-अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांना उदय कुलकर्णी (ऑर्गन), प्रशांत पांडव (तबला), पंढरी दरेकर (पखवाज) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. अजय वैद्य यांनी केले.
विश्वजित मिस्त्री आणि दुष्यंत सातभाई यांना उद्योजक प्रकाश धोका यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी तरंगिणी प्रतिष्ठानचे पंडित शौनक अभिषेकी, वंदना खांडेकर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, विश्वस्त अधीश पायगुडे, कार्याध्यक्ष पोपटलाल शिंगवी, कोषाध्यक्ष रामचंद्र शेटे आदी उपस्थित होते.