नॉटिंगहॅम – युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची लॉटरी लागली आहे. दुखापतग्रस्त शिखर धवन याला पर्याय म्हणून त्याला येथे पाचारण करण्यात आले आहे. धवन हा तीन सामने खेळणार नसल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेट् नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) चर्चा केल्यानंतर ऋषभ याला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडण्यात आला, त्याचवेळी पंत याच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र त्याच्यापेक्षा अनुभवी फलंदाज व यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याच्या बाजूने झुकते माप देण्यात आले. पंत याला संधी न दिल्यामुळे निवड समितीवर टीकाही झाली होती. धवन जखमी झाल्यानंतर जेव्हां बदली खेळाडू मागविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या, त्यावेळी ज्येष्ठ खेळाडू व समीक्षक सुनील गावसकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी पंत यालाच बोलवावे असा आग्रह धरला.
जबाबदारी पार पाडणार – ऋषभ
विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे माझे स्वप्न साकार होणार असले तरीही धवनची उणीव भरून काढण्याची माझ्यावर जबाबदारी आहे व ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माझ्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करीन असे पंत याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, विराट् कोहली, महेंद्रसिंग धोनी आदी खेळाडूंसमवेत या स्पर्धेत खेळण्याची संधी हा अतिशय संस्मरणीय क्षण आहे. संघातील वरिष्ठ खेळांडूकडून मला भावी कारकीर्दीसाठी शिकवणीची शिदोरी मिळणार आहे.