पिंपरी – रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास 9 जुलैपासून रस्त्यावर रिक्षा दिसणार नाहीत. रविवारी (दि.9) मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल गोरेगाव येथे आयोजित केलेला रिक्षा संघटनेचा व चालक-मालकांचा मेळावा ऑटोरिक्षा चालक – मालक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्यात मागण्या मान्य न झाल्यास 9 जुलैपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष मारुती कोंडे प्रमोद घोने, शंकर साळवी, शिलाताई डावरे, सुरेश गलांडे, ईल्यास लोधी खाण, विजय पाटील फिरोज मुल्ला दत्ता पाटील मोक्षवीर लोकरे, महपती पवार, राजू शिदगणे, संतोष शर्मा जावेद शेख मसूर नदाफ बाळा जगदाळे, गणेश जाधव बेलूर स्वामी, ज्ञानेश्वर हुमणे सह राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना रिक्षा चालकांच्या मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.
राज्यातील ऑटोरिक्षाचे मुक्त परवाने वाटप बंद करावे, स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, थर्ड पार्टी इन्शुरन्स दर कमी करावा, ओला -ऊबेरवर कार्यवाही करुन त्यांना हद्दपार करावे, अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, ऑटोरिक्षा चालकास पब्लिक सर्व्हन्ट हा दर्जा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आत्महत्याग्रस्त ऑटोरिक्षा चालकांना श्रद्धांजली अर्पण करून मेळाव्याची सांगता करण्यात आली.