पवना धरणाच्या पाण्यातून
विक्रमी उत्पन्न : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात घट
वडगाव मावळ – कडक उन्हामुळे मावळमधील धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या कमालीची घट झाली आहे पवना धरणात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 40 टक्के साठा होता यावर्षी 33 टक्के साठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे पवना धरणाच्या पाण्यातून यंदा 54 कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.
मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडिवळे, कासारसाई, जाधववाडी ही शेतीबरोबरच उद्योगाला पाणीपुरवठा करणारी व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत. पिपरी-चिंचवड शहरासाठी धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने 440 दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने ऑक्टोबर महिन्यात केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. 15 मार्चपासून 470 दशलक्ष लिटर एवढेच पाणी सोडण्यात येत आहे. पवना धरण हे सर्वांत मोठे असून, त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील 50-60 ग्रामपंचायतीच्या पाणी योजना आणि शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.
या संदर्भात पवना धरणाचे शाखा अभियंता ए एम गदवाल म्हणाले की, सध्याच्या कडक उन्हामुळे दिवसेंदिवस पवना धरणात पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. 15 जूनपर्यंत पाणीटंचाई टाळण्यासाठी व सध्या असलेला पाणीसाठा जुलैअखेर पुरविण्यासाठी धरणातून रोज 440 दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते.
धरणाच्या पाण्यातून यावर्षी 54 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने सात टक्के साठा कमी आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने 440 दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली होती.