अमेय गुप्ते
मराठी काव्याची पताका आपल्या अलौकिक काव्यप्रतिभेच्या सुंदर आविष्काराने सतत फडकत ठेवून काव्यदरबारात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे थोर कवी म्हणजे कै. नारायण वामन टिळक. ते रेव्हरंड टिळक या नावाने प्रसिद्ध होते. त्यांची आज 9 मे रोजी 100 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा व काव्यप्रतिभेचा आढावा…
निसर्गाचे वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्हातील दापोली तालुक्यातील करंजगाव येथे 6 डिसेंबर 1861 रोजी नारायण टिळक यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वामन सखाराम टिळक हे व्यवसायाने तलाठी होते. त्यांच्या मातोश्री जानकीबाई होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण कल्याण व नाशिक येथे झाले. आईकडून कवितेचा वारसा टिळकांनी घेतला. त्यांनी “गंगा’ ही कविता लिहून काव्यदरबारात आपले पाऊल ठेवले. गंगा या काव्याचे गद्यात रूपांतर करून मातोश्रींना त्यांनी अर्पण केले. सन 1876 मध्ये टिळक यांच्या मातेचे निधन झाले. “किती गणू तुज आई उपकार सीमा नाही, या जगी’ या काव्यातून त्यांनी आपल्या आईस श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर ते नाशिक येथे आले असता, त्यांचे जवळचे मित्र विश्वनाथ रामकृष्ण मायले यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आधार दिला. तेथे त्यांनी मठात जाऊन वेद, भगवद्गीता, संस्कृत, उपनिषदे यांचे पठण करून त्यात प्रावीण्य मिळवले. पुढे वेदशास्त्र संपन्न गणेशशास्त्री सदाशिवशास्त्री लेले यांच्याकडून त्यांनी मराठी-संस्कृत काव्याचे शिक्षण घेऊन वयाच्या 16 व्या वर्षी मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवले. 1880 मध्ये नारायण गंगाधर गोखले यांची कन्या मनकर्णिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्या लक्ष्मीबाई नारायण टिळक झाल्या. त्या काळी नाशिक येथे “स्वसुधारणेछु’ सभेमुळे त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले. या सभेमुळे टिळक यांच्यातील उत्तम वक्ता उदयाला आला.
गणेशशास्त्री त्यांना “महाराष्ट्र कोकीळ’ असे म्हणत. सन 1880 ते 1895 या काळात टिळकांनी नाशिक, जलालपूर, धामक, नागपूर, मुरबाड, मुंबई, पुणे या ठिकाणी आपल्या चरितार्थासाठी भ्रमंती केली. समाजातील अस्पृश्यता, जातीयवाद, भेदाभेद नष्ट व्हावी असे त्यांना वाटत. त्यांना धार्मिकतेतून शांती हवी असल्याने त्यांनी एकदा कफनी धारण करून नाशिक येथील सप्तश्रुंग गडावर जाऊन योगी बनले. पण हे त्यांचे रूप साधारण एक वर्ष टिकले. धर्म हा शक्यतो माणुसकीला धरून असावा असे त्यांना वाटे.
एकदा टिळक नागपूर ते राजनांदगाव असा रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना एक युरोपीय गृहस्थ गाडीच्या डब्यात भेटले असता त्यांनी टिळकांना नवा करार हे पुस्तक दिले. टिळकांनी ते पुस्तक वारंवार वाचले व त्यांच्या धर्म या व्याख्येची पूर्तता झाली. तसेच मिस्टर व मिसेस मिल्टन या मिशनरी व्यक्तींच्या सहवासातून त्यांना प्रार्थना व भजने शिकावयास मिळाली. नागपूरमधील राजनांदगाव येथील संस्थानात ते नाझर राजाचे वैयक्तिक सचिव म्हणून काम करत असताना एकदा कचेरीची साफसफाई ते करीत होते. तेव्हा त्यांना एका पेटीत दोन बायबलचे ग्रंथ व “ब्युटिफूल थॉट्स ऍन्ड स्पिरीच्युअल थिंग्स’ हे पुस्तक मिळाले. या पुस्तकात त्यांना हवी असलेली सर्व माहिती मिळाली. त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. टिळकांनी ख्रिस्तधर्म स्वीकारला. पुढे टिळक मुंबईला भायखळा येथे राहण्यास आले व त्यांनी ख्रिस्तधर्माचा अभ्यास केला. 10 फेब्रुवारी 1895 या दिवशी भायखळा येथील ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये त्यांना रेव्हरंड तुकाराम चिपाळकर यांनी बास्तिमा दिला व ते टिळक रेव्हरंड झाले. त्यांनी धर्म परिवर्तनाला अनुसरून काव्यही केले आहे.
टिळकांचे काव्य हे आधुनिक काळातील काव्य होते. त्यांनी घड्याळ काय म्हणते, मुलास योग्य बक्षीस’ ही काव्ये लहिली. गोल्डस्मिथच्या “डेझर्ट विलेज’चे “माझे ओसाड गाव’ असे मराठी रूपांतर केले. सन 1888 मध्ये “बापाची विलापिका’ लिहिली. सन 1889 मध्ये ते नागपूरमध्ये असताना कवितेला वाहिलेले “काव्यकुसुमांजली’ हे मासिक त्यांनी चालवले. त्यानंतर त्यांनी ऋषी, विविध विषय तरंगिणी ही मासिकेही काढली. काव्यकुसुमांजली या मासिकात रसमहोत्सव, शृंगार, स्त्रीजीवन प्रशंसा आदी स्फुट काव्ये त्यांनी लिहिली. “वनवासी फुल’ मधील त्यांच्या अनेक साक्या “शृंगार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी ऋषी या मासिकात धर्मसुधारणा, धर्मसंरक्षण, चातुर्वर्ण्यनिर्णय, संध्या, वानप्रस्थ या विषयावर विपुल लेखन केले. सन 1893 मध्ये त्यांनी “सुबोध गीता’ ही ओवीबद्ध टीकात्म स्वरूपातील गीता लिहिली.
टिळक “जगन्मित्र’ या टोपणनावाने कविता करीत असत. त्यांच्या बाल कविता “बालोद्यान’मधून प्रसिद्ध होत. त्यांची काव्यरचना ही प्रासादिक व रसाळ आहे. तर त्यांच्या प्रेमकविता सोज्वळ आणि उदात्त आहेत. त्यांची दिंडी या वृत्तातील “सुशीला’ या कवितेतील ओळी आपणास उदात्ततेची जाणीव करून देतात. त्यांच्या अभंगांजली, भजनसंग्रह, ख्रिस्तायान या काव्यसंग्रहातून त्यांची श्रद्धाशीलता प्रकट होते. त्यांच्या अभंगवाणीत सुमारे 300 अभंग असून ते सन 1917 ते 1919 या काळातील आहेत. या अभंगावर संत तुकारामांचा प्रभाव दिसतो. मात्र, त्या मागचा उद्देश हृदयस्पर्शी आहे. त्यांनी अहमदनगर व सातारा येथे सन 1895 ते 1917 या काळात धर्मोपदेशक म्हणून कार्य केले.त्यांचे व बालकवी ठोमरे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अहमदनगर येथील घरात बालकवींचे अनेकवर्षे वास्तव्य होते.
कवी केशवसुतांचे पुरोगामीपण हा त्यांच्या काव्याचा जणू आधारस्तंभ. त्यांच्या काव्याची पताका जणू डौलाने फडकत आहेत. 9 मे 1919 रोजी भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात टिळक वयाच्या 57 व्या ख्रिस्ताशी एकरूप झाले. टिळकांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या अस्थी या अहमदनगर येथे लालटाकी येथील ख्रिस्त दफनभूमीत एका बाजूला पुरून त्यावर कबर बांधली. अशा या कवीचे पुरोगामी विचार व ईश्वराविषयी असलेली एकनिष्ठ आस प्रत्येकांनी लक्षात घेऊन त्याचा जर प्रसार व प्रचार केला, तर खऱ्या अर्थाने ती रेव्हरंड टिळकांना वाहिलेली श्रद्धांजली असेल. रेव्हरंड टिळकांना त्यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त अभिवादन!