लोकसभा निवडणूक आणि जागतिक व्यापारयुद्धाचा परिणाम
नवी दिल्ली: अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे जागतिक भांडवल सुलभता कमी होण्याची शक्यता आहे. त्यातच भारतामध्ये निवडणुकात संदिग्ध वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर स्थूलअर्थव्यवस्था कमकुवत होण्याची चिन्हे आहेत. या कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात गुंतवणूक काढून घेत आहेत.
मे महिन्यातील कामकाजाच्या पहिल्या सात दिवसांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारातून 3207 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. एप्रिल महिन्यात या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात 45 हजार 981 कोटी रुपयांची तर मार्च महिन्यात 11 हजार 182 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र नंतरच्या काळात व्यापारयुद्ध निर्माण झाल्यामुळे हे गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत.
2 ते 10 मे दरम्यानच्या आकडेवारीनुसार या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात केवळ 1344 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर याच काळात त्यांनी 4552 कोटी रुपये गुंतवणूक काढून घेतली. यासंदर्भात बोलताना बजाज कॅपिटलचे उपाध्यक्ष आलोक अग्रवाल यांनी सांगितले की, निवडणुका आणि जागतिक परिस्थितीमुळे या पंधरवड्यात परदेशी संस्था कर गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात विक्री केली असली तरी दीर्घ पल्ल्यात हे गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक कायम ठेवण्याची शक्यता आहे. भारताबाबत गुंतवणूकदारांच्या मनात सकारात्मक वातावरण होते. मात्र नंतर विक्रीचा जोर वाढला आहे.
ग्रो डॉट इन या कंपनीचे मुख्य कार्यपालन अधिकारी हर्षद जैन यांनी सांगितले की, जगातील सर्वात दोन मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारयुद्ध चालू आहे. त्याचा केवळ भारतालाच नाही तर अमेरिकेसह सर्वच देशांना फटका बसला आहे. त्याचबरोबर अमेरिका-इराणदरम्यानचा तणावामुळे क्रुडच्या दरावर परिणाम होणार आहे. या सर्व बाबीचा जगाबरोबरच भारतावर परिणाम होणे अपेक्षित आहे.