सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतला. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले किशोर धुमाळ यांनी सोमवारी आपला अर्ज माघारी घेतला. दरम्यान, अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या आखाड्यात आता 9 उमेदवार उतरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीच्या आखाड्यात आता राष्ट्रवादीकडून खा. उदयनराजे भोसले, महायुतीकडून नरेंद्र पाटील, वंचित बहुजन
आघाडीकडून सहदेव ऐवळे, बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील, बसपाकडून आनंदा थोरवडे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून दिलीप जगताप, अपक्ष म्हणून शैलेश वीर, अभिजीत बिचुकले, सागर भिसे आदी उमेदवार आता निवडणुकीच्या आखाड्यात असणार आहेत. निवडणुकीसाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 21 एप्रिलपर्यंत प्रचार करता येणार आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्जानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे.