नवी दिल्ली – भांडवल सुलभतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जागतिक व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. त्यातच आता महागाईच्या पातळीवर ही सरकारची डोकेदुखी वाढली आहे.एप्रिल महिन्यात किरकोळ किमतीवरील महागाईचा दर वाढून 2.92 टक्के इतका नोंदला आहे.
अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे एप्रिल महिन्यात एकूणच महागाईचा दर वाढला असल्याचे एकूण आकडेवारीवरून दिसून येते. केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 2.86 टक्के होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हा दर 4.58 टक्के होता.
रिझर्व्ह बॅंक पतधोरण तयार करताना किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा प्रामुख्याने विचार करीत असते. दरम्यान, क्रिसील या संस्थेने जारी केलेल्या अभ्यास अहवालानुसार ही महागाई चार टक्क्यांपर्यंत वाढू शकते. आगामी काळात अन्नधान्याचे दर वाढण्याची शक्यता असल्यामुळे आणि क्रूडचे दर वाढत असल्यामुळे किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर वाढवू शकतो असे या संस्थेचे अर्थतज्ज्ञ धर्मकीर्ति जोशी यांनी सांगितले.