मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधील राजीनामा सत्रात सहभागी होत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र मिलिंद देवरा यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या हेतूबाबतच पक्षाचे जेष्ठ नेते संजय निरुपम यांनी जाहीररीत्या प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये नव्याने सुरु झाल्या आहेत.
याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे आपली भूमिका मांडली असून ते म्हणतात, “राजीनामा देत असताना त्यामागे ‘त्यागाची’ भावना असणं अनिवार्य असतं. मात्र इथे तर राजीनाम्याच्या दुसऱ्याच क्षणी ‘राष्ट्रीय’ पातळीवरील पदाची मागणी केली जात आहे. हा राजीनामा आहे की मोठं पद काबीज करण्याची शिडी? पक्षाने अशा ‘कर्मठ’ लोकांपासून सावध राहावे.”
दरम्यान, संजय निरुपम यांनी केलेल्या ट्विटमुळे मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत दुफळी पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून त्यांनी आणखी एका ट्विटद्वारे देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यापेक्षा सदर पदावर त्रि-सदस्यीय समिती नेमावी या मागणीला देखील खोडा घातला आहे. देवरा यांच्या या मागणीबाबत ट्विट करताना निरुपम यांनी ही मागणी मान्य झाल्यास पक्षाची आणखी वाताहत होईल असं म्हंटलं आहे.
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेस पदावरून उचलबांगडी करत या पदावर मुरली देवरा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
इस्तीफा में त्याग की भावना अंतर्निहित होती है।
यहां तो दूसरे क्षण ‘नेशनल’ लेवल का पद मांगा जा रहा है।
यह इस्तीफा है या ऊपर चढ़ने की सीढ़ी ?
पार्टी को ऐसे ‘कर्मठ’ लोगों से सावधान रहना चाहिए।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 7, 2019
The idea to appoint 3 member committee to run Mumbai Congress in place of President is not at all appropriate.
It will ruin the party further.
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 7, 2019