पुणे – नक्षलग्रस्त भागात सलग ७२ तास ड्युटी करून जवानांना लगेच नवीन ठिकाणी रवाना होण्यासाठी आदेश देण्यात आले. यावेळी जवानांना पुरेसे जेवण आणि आरामही देण्यात आल्या नसल्याचे वृत्त मध्यंतरी माध्यमांमध्ये फिरत होते. परंतु, यानंतरही शासनाला जाग आलेली दिसत नाही. कारण दिव्यांग, वृद्ध मतदारांना व्हील चेअरवर नेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारपर्यंत जेवण, नाष्टा मिळाला नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. किष्किंधानगर येथील ही घटना आहे.
अंध आणि दिव्यांग मतदार तसेच वृद्ध मतदारांना मदत करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक ठेवण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या जेवणाची आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली नसल्याचे दिसत आहे. याबद्दल पोलिसांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यास माहिती दिल्यानंतर ही जबाबदारी आमची नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली आहेत. यामुळे किष्किंधानगरमधील ५ कर्मचारी उपाशी आहेत. केंद्र अधिकाऱ्याने हात वर केल्याने ही जबाबदारी कोणाची असा प्रश्न निवडणूक कर्मचारी वर्गातून विचारण्यात येत आहे.