माथेरान, खालापूरसह लोणावळा, महाबळेश्वर येथे अतिवृष्टीची नोंद
जुलैचे स्वागत मुसळधार पावसाने?
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा खंड सुरू आहे. मात्र, दि.1 जुलैपासून धुव्वाधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. 1 ते 3 जुलै दरम्यान कोकण-गोवा आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पावसाचा असण्याचा अंदाज आहे.
पुणे – नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाच्या प्रगतीमध्ये अजूनही प्रगती नसल्यामुळे मान्सूनची उत्तरसीमा स्थिर आहे. सध्या पावसाचा खंड सुरू असून, पुढील दोन दिवस हा खंड राहील. त्यानंतर आठ दिवस जोरदार पावसाचे असल्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यातील पालघर, माथेरान, खालापूर, वसई, कर्जत, पेन, आणि मध्य महाराष्ट्रातील लोणावळा आणि महाबळेश्वर येथे अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पालघर येथे तब्बल 450 मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यात गेल्या दहा दिवसांपासून कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर विदर्भातही पावसाची रिपरिप सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पेरण्यासाठीचा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणीची लगबग सुरू असून, घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढल्याने फेसाळणाऱ्या धबधब्यांना सुरूवात झाली आहे.
शहरात 2 मिमी पाऊस शहरात पावसाचा जोर शनिवारी (दि. 29) काहीसा कमी झाला, तरीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. सायंकाळी एक-दोन जोरदार पावसाच्या सरी झाल्या. सायं. साडेआठ वाजेपर्यंत शहरात 2 मिमी पावसाची नोंद झाली. पाषाण येथे 3, तर लोहगाव परिसरात दीड मिमी पावसाची नोंद झाली.