जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची मागणी
फलटण – उन्हाची वाढती तीव्रता, त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेवून नीरा उजवा कालव्याद्वारे पाण्यासाठी राखीव कोट्यातून उपलब्ध पाणी त्वरित सोडण्याची मागणी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
भाटघर, वीर, गुंजवणी, नीरा-देवघर या धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला असून आता केवळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील वारकरी/भाविक आणि कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याचे पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव पाणीसाठा शिल्लक असल्याचे नमूद करीत सदरचे पाणी तातडीने उजव्या कालव्याद्वारे सोडून फलटण शहर व तालुक्यातील पाणीपुरवठा योजना आणि टॅंकरसाठी पाणी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी संजीवराजे यांनी केली आहे.
नीरा उजवा कालवा दि. 18 मे रोजी बंद झाल्यापासून गेले 20/22 दिवस उपलब्ध पाणीसाठा वापरण्यात आला, आता संपूर्ण पाणीसाठा संपला असल्याने कालव्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत, तर फलटण नगर परिषद पाणीपुरवठा योजनेतून शहराला तसेच ग्रामीण भागातील टॅंकर भरून देण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येते. मात्र नगरपरिषद पाणीपुरवठा योजना साठवण तलावातील पाणीही संपुष्टात आल्याने शहर व ग्रामीण भागात होणारा पाणीपुरवठा करणे यापुढे शक्य होणार नसल्याने नीरा उजवा कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी संजीवराजे यांनी केली आहे. पूर्व नियोजनानुसार शनिवार दि. 8 रोजी नीरा उजवा कालव्याद्वारे पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र 11 तारीख उलटली तरी नीरा उजवा कालवा विभागाने कालव्यात पाणी सोडले नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तातडीने नीरा उजवा कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी करतानाच नीरा उजवा कालवा विभाग कार्यकारी अभियंता यांनी याची गंभीर दखल घेवून तीव्र टंचाईच्या काळात पाणी न सोडण्याची किंवा उशीराने सोडण्याची भूमिका चुकीची असल्याने ग्रामीण व शहरी भागात जनावरे व लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले टॅंकर्स नगरपरिषद पाणी पुरवठा साठवण तलावावर उभे राहिल्यास ग्रामीण भागातील पाणी टंचाई अधिक तीव्र होणार आहे.
दि. 8 रोजी पूर्व नियोजनानुसार नीरा उजव्या कालव्यात सोडण्यात येणारे पाणी अद्याप सोडले नसले तरी तहसीलदार फलटण यांनी मात्र दि. 10 रोजी काढलेल्या आदेशाद्वारे पिण्यासाठी सोडण्यात आलेल्या या पाण्याचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंत्यांच्या मागणीनुसार भरारी पथके स्थापन केली असून त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व वीज वितरण कंपनीच्या वायरमनचा समावेश केला आहे. या आदेशात दि. 11 रोजी पाणी सोडले जाणार असल्याचे नमुद आहे.