नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास केवळ एकच दिवस राहिला आहे. परंतु, त्याआधी विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीवरून चांगलाच गोंधळ केला आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि भाजप नेते गिरीराज सिंह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ते जिंकले तर ईव्हीएम ठीक होते आणि आम्ही जिंकलो तर ईव्हीएममध्ये गडबड. आपला पराभवाचा स्वीकार न करण्यासाठी केवळ बहाणे बनवत असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.
रविशंकर प्रसाद म्हणाले कि, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड त्यांनी (काँग्रेस) जिंकले तर ईव्हीएम ठीक आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी जिंकल्या तर ईव्हीएम व्यवस्थित आहे. आपनेते अरविंद केजरीवाल जिंकले तर ईव्हीएम ठीक आहे. मात्र भाजप जिंकली तर ईव्हीएममध्ये गडबड आहे. आपल्या पराभवाचा केवळ एक बहाणा शोधत आहे. आणि विशेष म्हणजे चौथ्या टप्प्यापर्यंत विरोधक शांत होते. पण पाचव्या टप्प्यात पराभव होणार आहे हे कळले तेव्हा ईव्हीएमचा बहाणा बनविण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
गिरीराज सिंह म्हणाले कि, विरोधक जनादेश स्वीकारत नाही. विरोधक जातीय समीकरणे करू पाहत होती. मात्र देशातील जनतेने जातीय समीकरणाला अस्वीकार केले आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.