अश्विनी महामुनी
दहावीचा निकाला नुकताच लागला आहे. गेले दोन अडीच महिने परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालकही निकालाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. निकालाची इतकी उत्कंठा तर निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांनाही नसेल, निकालाची वाट पाहणारांतही हौशे, गवशे नवशे असे अनेक प्रकार असतात.
अगदी 35-40 टक्के मार्क मिळवून सुटणारे आनंदाने बागडत असतात. पास होणे हाच त्यांच्यासाठी मोठा पराक्रम असतो त्यांच्यासाठी. दुसरे असतात क्लास मिळ्वणारे. 60-70-80 टक्के गुण मिळ्वणे आणि चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवणे एवढेच त्यांचे मर्यादित ध्येय असते. आणि तिसरा वर्ग असतो तो मेरीट वाल्यांचा. त्यांच्यासाठी 90-92-94 टक्के म्हणजे कमीपणा असतो, मानहानी असते. इतके गुण मिळाल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर उल्हास नसतो. असलेच तर दु:ख असते, वेदना असते. ऑलिंपिक स्पर्धेत एक शतांश सेकंदाने गोल्ड मेडल मिळालेल्या धावपटूचे जे दु:ख असते, तेच त्यांच्या वाट्याला असते. हेचि फल काय मम तपाला अशी त्यांची भावना असते.
आणि त्याहूनही धक्कादायक बाब असते ती त्यांच्या घरच्यांची, आईवडिलांची, जिवाभावाच्या लोकांची प्रतिक्रिया. काय? फक्त 92 टक्के मार्क? असा प्रश्न ते एखादा गुन्हा केल्याच्या अविर्भावात विचारत असतात. इतके अधिक गुण मिळवूनही ते आकाशसे गिरे खजूरमें अटके अशा अवस्थेत असतात. याचे कारण एकच. अवास्तव अपेक्षा, अवास्तव कल्पना. आणि त्यातून आलेला अपेक्षाभंग. निराशा!
हे सारे आठवण्याचे कारण कालच व्हाट्स ऍपवर आलेले एक पत्र. एका विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांना उद्देशून लिहिलेले. ते वाचताना मन गलबलून आले. त्या बिचाऱ्या स्कॉलरबद्दल. त्याने लिहिलेले थोडक्यात असे-
प्रिय पप्पांस साष्टांग नमस्कार-
माझा रिझल्ट लागला. मला 82 टक्के मार्क मिळाले. खरं सांगतो, मला खूप खूप आनंद झाला, पण तो व्यक्त मात्र करता आला नाही. कारण मला 82 टक्के मार्क मिळाले म्हणजे मी तुमच्या दोघांच्याही दृष्टीने गुन्हेगार झालो, ढ झालो. तुमच्याप्रमाणेच माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी आईही नाराज झाली. कारंण तुम्हा दोघांनाही माझ्याकडून 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्काची अपेक्षा होती. ते मी मिळवू शकलो नाही. मी नको म्हणत असतानाही तुम्ही मला सायन्स साईडला प्रवेश दिला. प्रयत्न करूनही मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळत नाहीत.
सर म्हणाले होते, जग फक्त जिंकलेल्यांचं स्वागत करतं, हारतुरे, सन्मान त्यांच्याच वाट्याला येतात. हारलेल्याला कोणीही जवळ घेत नाही. म्हणून जीव तोडून प्रयत्न करा, यशस्वी होण्याचा प्रयत्न करा.
एवढेही करून अपयश आलं तुमच्या वाट्याला, तर खचून जाऊ नका. शांतपणे घरी जा. साऱ्या जगाने जरी दरवाजे बंद केले, तरी तुमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडेच असतील. आईवडील तुम्हाला जवळ घेतील. आणि त्यांनी दूर लोटले तरी या गरीब शिक्षकाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडा असेल. हे ऐकून सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या, अगदी जोरात. आता मला अपयशाची भीती वाटत नाही.
पप्पा, ढ मुलाला बाप आणि आई खरोखर मिळणार नाही का हो? आपला लाडका नसलेला ढ विद्यार्थी. हे सारे वाचून माझे डोळे पाणावले. अशी स्थिती खरोखरच अनेक ठिकाणी झालेली आहे. आपण मुलांना मार्क मिळवण्याचे मशीन बनवत आहोत. त्यांचे बालपण नष्ट करत आहोत, याची खरंच आवश्यकता आहे?