निमसोड (ता. खटाव) येथील सुपुत्र व राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांचा शनिवार दि. 15 जून 2019 रोजी वाढदिवस साजरा होत आहे. सर्वसामान्य मजूर कुटुंबात जन्माला येऊन स्वत:चा प्रपंच नेटका करण्याबरोबर समाजाच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष करणाऱ्या या लढाऊ सैनिकाबद्दल वाढदिवसाच्या निमित्ताने…
बेलदार समाजातील बाळासाहेब देवकर या सर्वसामान्य मजूर कुटुंबात श्रीकांतचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता आले. शाळा सोडल्यानंतर आई-वडिलांच्याबरोबर कामात मदत करणे सुरू झाले. काही दिवसांनी स्वत: मोलमजुरी, किरकोळ कामे, खडी फोडणे, कराड येथून होलसेल दरात मासे आणून ते आसपासच्या खेड्यात हातकाट्यावर विकण, अशी छोटी-मोठी कामे त्यांनी केली. चुलते बसाप्पा देवकर यांच्या मजूर संस्थेवर छोटी- छोटी शासकीय कामे सुरु केली. थोडा अनुभव आल्यानंतर त्यांनी 2005 मध्ये व्यंकटेश कन्स्ट्रक्शन ही स्वत:ची फर्म रजिस्ट्रेशन केली. या फर्मच्या माध्यमातून त्यांनी खटाव- माणसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामाजिक सभागृहे, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, सिमेंट बंधाऱ्यांची कामे, तलाव दुरुस्ती अश्या प्रकारची कामे केली आहेत.
श्री. देवकर यांच्या अंगी शालेय जीवनापासूनच संघटन व नेतृत्वाची आवड आहे. उद्योग व्यवसायात स्थिरता आल्यानंतर त्यांचा ओढा समाजकारणाकडे वळला. त्यांनी 2011 मध्ये निमसोड येथील मोराळे रस्त्यावरील भटक्या विमुक्तांच्या वस्तीत देवनगर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. मंडळाचे ते स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष आहेत. मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव, दुर्गा उत्सव तसेच महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी होतात. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर अशा प्रकारचे विधायक उपक्रम राबविल. निमसोडमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यामध्ये श्री. देवकर यांचा मोठा वाटा आहे.
वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांना वाढीव कामे व जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी राजकीय पक्षाचा आधार घ्यावा वाटला. लोकनेते महादेव जानकर यांच्या कार्याची प्रेरणा घेवून त्यांनी 2015 पासून राष्ट्रीय समाज पक्षाचे काम सुरू केले. निमसोड गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी पक्षाचे पॅनेल टाकले. स्वतंत्र शक्ती निर्माण करताना त्यांना सुरुवातीला मोठा त्रास सहन करावा लागला. तरीही न डगमगता प्रसंगी कोर्ट, कचेऱ्या करत त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत त्यांनी पक्षाच्या चिन्हावर तीन जिल्हा परिषद व नऊ पंचायत समितीच्या जागा लढविल्या. या उमेदवारांना लक्षणीय मतेही मिळवून दाखवली. त्यांच्या कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांना युवा जिल्हाध्यक्षपद बहाल केले.
त्यांनी मंत्री महादेव जानकर यांच्या विकास निधीतून औंध येथे दहा लाखाचे माजी सैनिक भवन, वरुड येथे पाच लाखांचा सभामंडप तसेच माण तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लावली. याशिवाय जानकर यांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागातील अनेक योजना दुष्काळी भागात आणण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.