माधव विद्वांस
मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविणारे विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक कै. राम नगरकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील सारोळा येथे 5 एप्रिल 1930 रोजी झाला.लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी काहीतरी करायचेच या हेतूने शिक्षण सोडून मुंबई गाठली. मुंबई नगरी त्यावेळी चाळ संस्कृतीत सगळ्यांना सामावून घेत होती, आताच्या सारखी संकुल संस्कृती नव्हती.रोजगारासाठी एकटे राहून थकल्या भागल्या जीवांना भजनाने, विनोदाने, वगनाट्याने आनंद मिळायचा. त्या मुंबईतील प्रवाहात नगरकर मिसळून गेले. साधारण 1945 च्या सुमारास ते मुंबईत दाखल झाले.
त्यावेळी स्वातंत्र्याचे रणशिंग वाजत होते. रामभाऊ सेवादलाच्या माध्यमातून चळवळीत उतरले. निळू फुले, पु. ल. देशपांडे अशी अनेक मंडळींच्या सहवासात ते आले. त्यावेळी दादा कोंडके सेवादलात होते. वसंत सबनिसांच्या “विच्छा माझी पुरी करा’मध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांनी काम केले. राम नगरकर हे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात काम करीत असत. त्यांनी तेथे सहज सांगितलेल्या किश्शांचे रूपांतर म्हणजे “रामनगरी’ हे नगरकरांनी लिहिलेले विनोदी आत्मकथापर पुस्तक. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले.
ग्रामीण ढंगातील लोकनाट्य हा प्रकार उच्चभ्रू समाजात नेण्याचे कार्य ज्यांनी केले त्यामध्ये राम नगरकरांचे नाव पहिल्या पंक्तीत घ्यावे लागेल. तमाशा म्हणून नाक मुरडणाऱ्या लोकांना ग्रामीण “ईनोद’ आणि “हिसका’ काय असतो याची खरी माहिती झाली राम नगरकरांमुळेच. नगर जिल्ह्यात त्यांचा जन्म व बालपण गेले त्यामुळे अस्सल नगरी बाजाचे त्यांचे बोलणे आणि नैसर्गिक अभिनय यामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. आत्मकथा लिहिणारे व आत्मकथन मंचावर करणारे ते पहिले ग्रामीण नाटककार होते. ग्रामीण भागातील लोकांचे जीवन, त्यांचे स्वभाव, त्यांचा ईनोद, त्यांच्या क्लृप्त्या, त्यांच्या समजुती, भाबडेपणा या सर्वच गोष्टी त्यांनी रामनगरीमधून खुमासदार पद्धतीने प्रेक्षकांसमोर तसेच पुस्तकरूपाने वाचकांपर्यंत पोहोचविल्या.
रामनगरी हे पुस्तक वाचकांनी डोक्यावर घेतले. त्याला ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना आहे. अमोल पालेकर यांनी अभिनय केलेला “रामनगरी’ या हिंदी चित्रपटाचीही निर्मिती या आत्मकथनावरच झाली. त्यांनी स्वतःची मस्करी असलेला “रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम वर्ष 1980 पासून करण्यास सुरुवात केली व त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात व भारताच्या बाहेरही त्यांनी प्रयोग केले. त्यांनी याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. रामभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात चिरंजीव वंदन नगरकर यांना त्यांच्यातील वडिलांकडून आलेला वारसा पाहून अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिले. आज वंदन नगरकर यांच्यामुळे “रामनगरी’ रंगभूमीवर पुन्हा मंचावर अवतरली आहे.