अपघात होवूनही दुर्लक्ष : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा साधनांची मागणीमहावितरणच्या
वडगाव मावळ – महावितरणच्या मावळ तालुक्यातील कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने नसल्याने त्यांची सुरक्षा रामभरोसे आहे. विद्युत खांब व विद्युत तारा ओढण्याच्या कामात कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मावळ तालुक्यात जुनाट धोकादायक तसेच नव्याने विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी ठेकेदारांच्या वतीने विद्युत खांब उभारणे तसेच वीज तारा ओढण्याचे काम केले जाते. या कामाच्या वेळी कंत्राटी कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, अर्थिंग रॉड, हॅन्डग्लोज व बूट दिले जात नाही. अनेक कंत्राटी कामगार विद्युत खांब व विद्युत तारा ओढ्याच्या कामात सुमारे 30 ते 35 फुट उंचीच्या विद्युत खांबावर उभे राहून काम करताना अचानक तोल जाऊन कंत्राटी कामगार खाली पडून जखमी व मयत झाले आहेत.
विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी केल्यावर ते कंत्राटी कामगार असून आमचे कर्मचारी सुरक्षा साधनांचा उपयोग करतात असे बोलतात. कंत्राटी कामगारांच्या जीवाची परवाह नसल्याचे दिसत आहे. हे काम खूपच कष्टाचे असून कंत्राटी कामगारांच्या जीवाचा विचार करता, त्या कामगारांना सुरक्षा साधने दिल्याशिवाय त्यांच्याकडून काम करून घेऊ नये. वडगाव हद्दीत विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला सुरक्षा साधने न दिल्याने विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना, विद्युत विभागाच्या ठेकेदारांकडून होणारी कामे ही कामगारांना सुरक्षा साधने न देता करण्यात येत आहेत. त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसाळा तोडांवर आला आहे. या दिवसांमध्ये वारंवार विद्युत पुरवठ्याशी संबंधित कामे करावी लागतात. त्यामुळे या कामगारांचा जीव अधिक धोक्यात आले. त्यामुळे विद्युत खांब व विद्युत तारा ओढण्याच्या कामात कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल वहिले, यशवंत शिंदे, दिनेश पगडे, शरद मोरे, हरीश दानवे व नागरिकांनी केली.
विद्युत खांब व विद्युत तारा ओढण्याच्या कामात कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, अर्थिंग रॉड, हॅन्डग्लोज व बूट अशी सुरक्षा साधने वापरणे आवश्यक आहे. अपघात झाल्यास संबंधित ठेकेदारच जबाबदार आहे. विद्युत विभागाच्या वतीने सुरक्षा साधने पुरवली जातात.
विजय जाधव, उप अभियंता, महावितरण.