शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्यावतीने कामास सुरुवात; नागरिकांमध्ये समाधान
गोंदवले – शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्यावतीने राजवडी, ता. माण येथील बेंदवस्तीवरील दुरवस्था झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करत मुरमीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. राजवडी ते बेंदवस्तीवरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्ता दुरुस्तीसाठी त्याठिकाणच्या नागरिकांनी शेखरभाऊ गोरे यांच्याकडे कैफियत माडली होती. त्यावर शेखरभाऊ गोरे यांनी त्यांना कोणत्याही निधीचे, फंडाचे आश्वासन न देता ऑन द स्पॉट रस्त्यावर मशिनरी, रोलर, पाण्याचा टॅंकर पाठवून कामाला प्रत्यक्ष प्रारंभ केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
शेखरभाऊ गोरे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून माण- खटाव तालुक्यातील विविध गावे व वाड्यावस्त्यांवरील तलाव, बंधारे, ओढे-नाले, नालाबंडीगमधील गाळ काढण्यासाठी, भराव टाकण्यासाठी, दुरुस्तीसाठी, खोलीकरण, रूंदीकरण तसेच विविध ठिकाणच्या रस्त्यांवर मुरमीकरण, क्रॉंक्रिटीकरण आदींसाठी स्वखर्चाने मशिनरी लावून विकासकामे पूर्ण केली आहेत. विविध गावच्या स्वागत कमानी, पिकअप शेड, समाजमंदिरे, सभागृहे आदी विकासकामांसाठीही कोणत्याही निधीचे, फंडाचे आश्वासन न देता ऑन द स्पॉट स्वखर्चातून ती विकासकामे केली आहेत.
पाणी फाउंडेशनच्या कामालाही 250 दिवसांच्यावर पोकलेन मशीन दिल्या आहेत तर 15 टॅंकरद्वारे 53 गावे वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. ही सर्व कामे शेखरभाऊ गोरे सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रेमाखातर करताना दिसून येत आहेत. शेखर गोरेंच्या भगिनी सौ. सुरेखाताई पखाले यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी जीवन भोसले, धनाजी भोसले, सयाजी भोसले,अनिल भोसले, विकास जाधव, अमोल जाधव, दत्ता शिंदे आदी ग्रामस्थ, महिलावर्ग उपस्थित होते.
बेंदवस्तीवरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना येणे-जाणे अवघड होऊन बसले होते. अनेकदा छोट्या अपघातांना निमंत्रण मिळत होते. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकांकडे मागण्या केल्या. मात्र, सर्वांकडून फक्त आश्वासनेच मिळाली. परंतु, शेखरभाऊ गोरे यांच्याकडे हा विषय घेऊन आम्ही गेल्यानंतर त्यांनी कोणतेही आश्वासन न देता मशिनरी पाठवून थेट कामालाच सुरुवात केली आहे.त्यांच्यामुळे आमचा रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे.
धनाजी भोसले, बेंदवस्ती, राजवडी
शेखरभाऊंनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले असून माझ्यावर जी जनता प्रेम करते त्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. म्हणूनच ते पाणी फाउंडेशनच्या कामाला मशिनरी तसेच टंचाईग्रस्त गावे वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करत आहेत. जनतेने विविध विकासकामांची मागणी केल्यावर त्यांना कोणतेही आश्वासन न देता ऑन द स्पॉट काम सुरू करणारा राज्यातला हा पहिला देवमाणूस असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत.
सौ. सुरेखाताई पखाले