– सतेज औंधकर
कोल्हापूर – संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात महायुतीकडून लढणाऱ्या शिवसेनेला आत्तापर्यंत यशाने हुलकावणी दिली होती. पण यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विद्यमान खासदारांना पराभूत करून दिल्ली वारी करण्यात यशस्वी ठरले आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे गतगवेळचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांच्यावर 2 लाख 70 हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव करून मागील पराभवाचा वचपा काढला. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी जवळपास 1 लाख मतांनी विजय मिळवला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सुद्धा या मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनविला होता. निवडणूक काळात त्यांनी पाच वेळा कोल्हापूर दौरा केला होता. यातून महाघाडीचे बेरजेचे राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला होता. पण याच वेळी काँग्रेसचे एकमेव आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय हे घोषवाक्य बनवून धनंजय महाडिक यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हापूर शहरात सुरुवातीपासून महाडिक विरोधाचे वारे वाहू लागले होते. या विरोधाच्या शिडात भाजप शिवसेना व महायुतीच्या मित्रपक्षांना आणखी वारे भरले होते. परीणामी मंडलिक यांचे पारडे जड भासत होते. मात्र निकालातून नेमकं काय घडणार हे लक्षवेधी बनले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागून राहिले होते. तर तिकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्यामुळे राज्यभरात चर्चेचा आणि लक्षवेधी होता.
गेल्यावेळी महायुतीच्या वतीने निवडणूक लढवून शेट्टी हे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. महायुतीच्या तंबूतून बाहेर पडून शेट्टी यांनी महाघाडीशी जवळीक साधून ही निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते धैर्यशील माने होते. प्रारंभी या लढतीत राजु शेट्टी हे सहजपणे बाजी मरतील असे चित्र होते. कारण त्यांनी अनेक दुधाची आणि ऊसाची आंदोलनं यशस्वी केली होती. शिवाय त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सभा घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या मतदारसंघात मोठी सभा घेतली होती. सुप्रसिद्ध अभिनेता प्रकाशराज सुद्धा शेट्टींच्या प्रचारासाठी येऊन गेले पण, अखेरच्या टप्प्यात त्याला टोकाची कलाटणी मिळाली. माने यांच्यादृष्टीने अनेक घटक पथ्यावर पडली. माने यांची मराठा जात त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा, शेट्टी आणि साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक आणि नवमतदारांना माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे माने यांची बाजू अधिकाधिक भक्कम होत गेली त्याचा प्रत्यय या हातकणंगले लोकसभेच्या निकालातून समोर आला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
संजय मंडलिक – 7 लाख 49 हजार मते
धनंजय महाडिक – 4 लाख 78 हजार
अरुणा माळी – 63 हजार
धनंजय महाडिक यांच्या पराभवाची प्रमुख कारणे-
– धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे खासदार असूनही एकदाही पक्षातील कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला नाही.
– याउलट पक्षविरोधात जाऊन जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणूकीवेळी प्रचार केला. विशेषतः जिल्हापरिषदेच्या निवडणुकीवेळी भाजपच्या विजयी उमेदवारांना ज्या बस मधून आणले होते त्या बसचे सारथ्य सुद्धा त्यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोध पत्करावा लागला
– कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघ खूप महत्वाचा फॅक्टर ठरतो. हा दूध संघ मल्टिस्टेट होऊ नये म्हणून सतेज पाटील आणि इतर राजकीय नेते लढा देत असताना महाडिक कुटुंब मात्र गोकुळ ला मल्टिस्टेट करण्याचा घाट घालत होते. त्याला अनेक दूध उत्पादकांचा विरोध होता.
– सर्वच सत्ताकेंद्रांमध्ये महाडिक कुटुंबच पाहिजे. सत्ता एकवटण्याच्या या कारणाने लोकांमध्ये तीव्र नाराजी होती
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
धैर्यशील माने – 5 लाख 86 हजार
राजू शेट्टी – 4 लाख 90 हजार
अस्लम सय्यद – 1 लाख 23 हजार
राजु शेट्टींचा पराभवाची प्रमुख कारणे :
– राजू शेट्टी यांच्या पराभवाला सुद्धा अनेक कारणे स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यातील सर्वात मोठे कारण ठरले आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे. येथील उमेदवार अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार इतकी मते पडली आणि शेट्टींचा पराभव 96 हजार मतांनी झाला. यातील 70 टक्के मते तर नक्कीच खा.राजू शेट्टी यांना पडण्याची शक्यता होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा सर्वात मोठा फटका शेट्टींना बसल्याचे याठिकाणी दिसत आहे.
– गतवेळच्या निवडणुकीत शेट्टी ज्यांच्या विरोधात प्रचार करत होते त्यांच्या सोबत जाऊन शेट्टी मैदानात उतरले हे कुठंतरी लोकांना रुचलेले दिसत नाहीये..
– देशपातळीवर शेट्टींनी शेतकरी नेता म्हणून जरी ओळख निर्माण केली असली तरी स्वतःच्या मतदारसंघात त्यांचा संपर्क खूप कमी पडला असल्याचेही यावेळी दिसून आले
– चळवळीतील काही कार्यकर्त्यांनीच शेट्टींना पराभूत करण्यासाठी मदत केली..
– शिवाय शेट्टींच्या नावाशी साम्य असणारा बहुजन महा पार्टीतुन आणखीन एक राजू मुजिकराव शेट्टी हातकणंगले मतदारसंघाच्या रिंगणात होते. नावाशी साम्य आणि गेल्या वेळी शेट्टींना शिट्टी हे चिन्ह मिळाले होते तेच चिन्ह राजू मुजिकराव शेट्टी यांना मिळाल्याने त्यांना 7 हजार 971 इतकी मते पडली. या सर्वांमधून येथील निकालात झालेला हा मोठा बदल पाहायला मिळत आहे.
ज्या पद्धतीने सेना-भाजपचे सर्वच आमदार लोकसभेच्या निवडणूक प्रचारात उतरले होते, त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा सेनेचा कोल्हापूर जिल्ह्यात मोठा प्रभाव असणार आहे. कोल्हापूर हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पण त्याच बालेकिल्ल्यात आता सेनेचे 2 खासदार आणि 6 आमदार आहेत. त्यामुळे कोल्हापूरात काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीत मोठी कसरत करावी लागणार यात शंका नाही.