शिमला – भाजप सत्तेवर आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा कडक करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याच्या कॉंग्रेसच्या आश्वासनावर राजनाथ सिंह यांनी सडकून टीका केली. हिमाचल प्रदेशातील प्रचारसभेत ते बोलत होते.
भारत कोणत्याही देशाची इंचाएवढी भूमीही ताब्यात घेणार नाही, परंतु कोणत्याही देशाने भारताची भूमी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणतीही किंमत मोजून तो हाणून पाडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भाजप हा एकमेव असा पक्ष आहे, ज्याचा तळातील कार्यकर्ताही अविश्रांत प्रयत्नांनी मुख्यमंत्रीच नव्हे तर पंतप्रधानही होऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूचा असा एक पक्ष आहे जो फक्त एका कुटुंबाभोवती फिरतो, अशी टीकाही राजनाथ यांनी कॉंग्रेसचा उल्लेख टाळून केली. भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही त्याबद्दल कौतुक केले आहे.