खासगी रुग्णालयांचे सहकार्य अपेक्षित
पिंपरी – देशभरातील दारिद्र रेषेखालील नागरिकांसाठी तात्कालीन आघाडी सरकारने राजीव गांधी आरोग्य योजना जाहीर केली होती. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठी ही योजना जीवनरवाहिनी ठरत आहे. खासगी रुग्णालयापेक्षा शासकीय रुग्णालयांनी ही योजना राबविण्यात आघाडी घेतल्याची बाब समोर आली आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधित दोन हजारांहून अधिक नागरिकांनी राजीव गांधी योजनेच्या लाभ घेतला असून या योजनेद्वारे गरीब रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत मिळत आहेत. शासकीय रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णलयांतही ही योजना योग्य प्रकारे राबविल्यास सर्वसामान्य नागरिकांना त्याचा अधिक फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांना मोफत अथवा कमी दरात उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजना शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी लागू आहेत. केंद्र शासनाची आयुष्यमान ही योजना देशभर लागू असून महाराष्ट्र शासनाची राजीव गांधी योजना महाराष्ट्रात लागू आहे.
महाराष्ट्रातील रुग्णांना या दोन्ही योजनांचा वापर करण्याची मुभा आहे. अनेक रुग्ण आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचाराअभावी दुर्धर आजाराने मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडत होत्या. मात्र राजीव गांधी आणि आयुष्यमान या योजना लागू झाल्यापासून सर्वसामन्य नागरिकांना उपचार मिळण्यामध्ये वाढ झाली आहे.
ज्या नागरिकांकडे पिवळे रेशनकार्ड व वार्षिक उत्पन्न 85 हजारांच्या आत आहे, अशा रुग्णांवर या योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना उपचार, शस्त्रक्रियेविषयी माहिती सांगण्यासाठी वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी सरकारच्या विविध योजनांचे माहिती फलकही लावण्यात आले आहेत. राजीव गांधी व आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आवश्यक आहे.
सरकारी योजनांच्या माध्यमातून गरीबांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्याचा सरकारचा हेतू आहे. देशभरातील रुग्णांना गंभीर आजारांतून सावरण्यासाठी उपचार करताना आर्थिक सवलत आयुष्यमान व राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून दिली आहे. मात्र, खासगी रुग्णालयात नागरिकांना योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. खासगी रुग्णालयातील कर्मचारी शासकीय योजनांची नागरिकांनी व्यवस्थित माहिती देत नसल्याने रुग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. योजना उपलब्ध असतानाही पैशांसाठी अनेकांची पिळवणूक झाल्याची उदाहरणे रोज समोर येत आहेत. योजना उपलब्ध असल्याने तसेच उपचाराचा खर्च शासन खासगी रुग्णालयांना देत असल्याने खासगी रुग्णालयांनी गरिबांवर उपचार करताना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सरकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जात असतात. या योजना सर्वसामान्यांची ताकत बनून त्यांना सशक्त करण्यासाठी तयार केलेल्या आहेत. नागरिकांनी योजनांच्या अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आलेल्या आहेत. तसेच, योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र कार्यलयाची व्यवस्था आहे.
डॉ. शंकर जाधव , उपाधीक्षक : वायसीएम रुग्णालय