मुंबई – राज्यामध्ये येत्या सोमवारी लोकसभा निवडणुकांमधील चौथ्या टप्प्यातील मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या तोफा चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांकडे वळविण्यात आल्या आहेत. अशातच काल उत्तर मुंबईतील लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या एका प्रचार सभेमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आपल्या खास काव्यात्मक शैलीतून राज ठाकरेंवर टीका करताना रामदास आठवले म्हणाले की, ‘‘राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळासाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे’
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्ववभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (अ) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पंतप्रधाननवरील राज ठाकरेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आधीच ५६ विरोधक एकत्र आले असून त्यात आता ५७ नंबरला राज ठाकरे आले तरीही काही फरक पडणार नाही. राज ठाकरेंकडे सभेला गर्दी जमवण्याची ताकद असली तरी उमेदवार निवडूण आणण्याची ताकद आमच्याकडे आहे.’
आपल्या भाषणाच्या शेवटी आठवले यांनी “राष्ट्रवादी – काँग्रेस सोबत गेले आहेत राज… म्हणुनच इथे आलो आहे मी आज.. कारण मला जिरवायचा आहे महाआघाडीचा माज…” अशी काव्यात्मक रचना सादर करत उपस्थितांकडून दाद मिळवली.