मुंबई : आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पॅंथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईतील विक्रोळी त्यांच्या निवासस्थानी राजा ढाले यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेला असलेल्या त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा सुरु होईल आणि दादर चैत्यभूमी या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती. दलित पॅंथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे प्रमुख होते. राजा ढाले यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 1999 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र ते निवडून आले नाहीत. मराठीतल्या सत्यकथेची सत्यकथा त्यांनीच लिहिली. महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही त्यांनी लिहिला होता. त्यांच्या परखड विचारांसाठी आणि आक्रमकतेसाठी ते प्रसिद्ध होते.