पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने बुधवारी विश्रांती घेतली. दरम्यान, खडकवासला प्रकल्पात एकूण 14.08 टीएमसी म्हणजे 48.31 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली. मात्र, मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पाणीसाठा स्थिर आहे. सध्यस्थितील चार धरणांत मिळून सुमारे 50 टक्के पाणीसाठा असला तरी अजूनही धरणे पूर्णपणे भरणे बाकी आहे. त्यामुळे धरणपरिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढणे आवश्यक आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणी शहराला पिण्यासाठी तर ग्रामीण भागात शेतीसाठीचे आर्वतन याचा विचार करून या पाण्याचे वर्षभरासाठी नियोजन केले जाते. सध्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठा दिलासा देणारा असला तरी धरणे 100 टक्के भरणे गरजेचे आहे. पानशेत धरणात बुधवारी दिवसभरात 1 मिमी, वरसगाव 1 मिमी, टेमघर 3 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.