वडिवळे धरण 70 टक्के भरले
भातपिकाचे उत्पादन घेण्यावर येणार गंडांतर?
दमदार पावसाचा शेतकऱ्यांना फटका;शेतकऱ्यांची भात रोपांची उगवण होईना
यंदा पावसाचे आगमन झाल्याबरोबर दोनशे ते साडेतीनशे मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. अधिक पावसाने नाणे मावळातील वडिवळे धरण 70 टक्के भरले आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू होवूनही धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नाणे मावळ – नाणे मावळात पावसाची संततधार सुरू आहे. डोंगरालगत असलेल्या भात खाचरांमध्ये पेरणी केलेले बियाणे वाया गेली आहेत. जोरदार पाऊस पडल्याने पेरणी केलेली शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भात रोपांची उगवण क्षमता कमी झाली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना भात लावण्यासाठी रोपे नाहीत.
याशिवाय पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने पुन्हा पेरणी करावी हे देखील सोपे राहिले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यावर्षी भात पीक घेता येणार नाही. भरपूर प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांना भात पिकाचे उत्पादन घेता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या समस्येचा नाणे मावळातील नाणे, कोंडीवडे, मोरमारेवाडी, करंजगाव आदी गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.