पुणे – सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पुणे, नाशिक भागात दुपारनंतर अचानक वातावरणामध्ये बदल होऊन काही भागात तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस कोसळला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादकांच्या चिंता वाढल्या आहेत. तर आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागात पाऊस आल्याने आंबा उत्पादकांना याचा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.
तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ मध्ये जोराचा वारा आणि ढगांच्या गडगडाट होत पाऊस पडत असल्याची माहिती मिळाली आहे. बदलापूर भागातही पावसाला सुरुवात झाली आहे.