आज खटाव परिसरात ढगांच्या गडगडाटांसह व विजांच्या कडकडांटासह त्याचबरोबर वादळ वाऱ्यांसह मान्सूनपूर्व हलक्याशा पावसाचे आगमन झाले. असह्य उन्हाच्या झळांनी व उकाड्याने मानवी जीवन विस्कळीत झाले होते. गेले काही दिवस खटाव परिसराच्या आजूबाजूस पाऊस पडत होता.
परंतु खटाव परिसरात मात्र त्याचे आगमन होत नव्हते. पावसाच्या आगमनाने ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला आहे. जमिनीची खोल गेलेली पाणी पातळी भरून येण्यास बराच कालावधी लागणार आहे. एवढ्याशा पावसाने काहीही होणार नसले तरी वातावरणात मात्र गारवा निर्माण झाला होता व त्यामुळेच अल्पकाळ का होईना ग्रामस्थ मात्र सुखी झाले
आहेत.
वाई तालुक्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस
भुईंज, किकली, ओझर्डे, चिंधवली, पाचवडसह वाई तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात एकही पाऊस न झाल्याने वाई तालुक्यावरसुद्धा दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. प्रचंड उष्णतेने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. आज दुपारी 4 ते 5 वा. च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
एक तास पडलेल्या पावसाने रस्त्यावरून पाणी वाहत होते तर वाऱ्याने झाडांच्या फांद्या पडण्याची भीती व्यक्त होत होती. पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. या हंगामातील हा पहिलाच पाऊस असल्याने अनेक ठिकाणी लहान मुलांनी या पावसात चिंब भिजून पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत आकाश ढगाळलेले होते. देगाव, शिरगाव, निकमवाडी, खोलवडी, काळगवाडी, म्हापरवादी अश्या अनेक गावांना यावर्षी पहिल्यांदा दुष्काळाचा सामना करावा लागल्याने या पावसाने शेतकरी मात्र आनंदित झाले होते.