छावणीतील जनावरे वीज पडून दगावली; घरांवरील पत्रे गेले उडून, भिंती कोसळून संसार रस्त्यावर
जवळा उपकेंद्राचे सहा खांब जमीनदोस्त
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
जामखेड, जवळा – जामखेड तालुक्यात मंगळवारी (दि.4) झालेल्या मान्सून पूर्व वादळी वारा आणि पावसामुळे जामखेड तालुक्यातील जवळा, हळगाव, पिंपरखेड, सरदवाडी, आघी, मतेवाडी, नान्नज परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये पाऊस व वादळी वाऱ्यामुळे हळगाव येथील छावणीत वीज पडून शेतकरी शिवाजी ढवळे यांची एक गाय आणि एक बैल अशी दोन जनावरे तसेच आगी येथील हनुमंत तेरकर यांची गाय दगावली आहेत.
आघी, हळगावच्या शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे, तसेच घरांच्या भिंती कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. छावणीतील शेतकरी केलेला निवारा कालच्या पाऊस व वाऱ्याने उघड्यावर आला आहे. काही शेतकरी रात्रीतच छावणीतून काढता पाय घेतला. छावणीमध्ये व्यवस्थित निवाऱ्याची सोय नसल्यामुळे जनावरांसाठी साठवून ठेवलेला चाराही भिजून खराब झाला आहे. त्यामुळे जनावरांना चारा काय घालायचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या झालेल्या नुकसानाची शेतकरी वर्गातून नुकसान भरपाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
त्याचबरोबर जवळा येथील 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मुख्य लाईनमधील सहा खांब जमीनदोस्त झाल्यामुळे जवळा परिसर मंगळवारी रात्रीपासून अंधारात आहे. तसेच जामखेड महावितरणचे अधिकारी यांचे मोबाईल बंद असल्याने कर्जत येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क केला असता, विजेचे खांब आपल्या विभागीय कार्यालयाकडे उपलब्ध नाहीत ते मागवून घेणार असून, आज संद्याकाळपर्यंत ते खांब येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मात्र सकाळपासून अधिकाऱ्यांनी ज्या जबाबदारीने काम करायला पाहिजे ते त्यांनी केले नाही. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे जवळा, 33 केव्ही उपकेंद्र पुढील दोन दिवस अंधारात राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.
काल झालेल्या आगी आणि हळगाव व जवळा परिसरातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून, त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देऊ.
विशाल नाईकवाडे तहसीलदार, जामखेडछावणीतील जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, दोन-दोन दिवस पाणी मिळत नसल्यामुळे जनावरे पाण्याअभावी मरण्यापेक्षा छावणीतील जनावरे आम्ही घरी घेऊन जात आहे. रात्रीच्या पावसामध्ये आम्ही आमचे मरण पहिले आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे.
माऊली रोडे शेतकरी, आळजापूरदोन दिवस वीज येणार नसल्याने माझ्याकडील 10 जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचबरोबर नागरिकांचादेखील पिण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
रामभाऊ होले , शेतकरी, जवळा