पुणे – घाटमाथा वगळता राज्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली असली, तरी येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची लक्षणे दिसू लागल्याने गुरुवारपासून राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन होईल.
दरम्यान, सध्या फक्त घाट माथ्यावर पावसाचा जोर आहे. त्याचबरोबर कोकणातही एक ते दोन सरी दिवसभरात कोसळत आहेत. त्याव्यतिरिक्त राज्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात सर्वत्र पावसाला सुरूवात झाली होती. हा पाऊस आठवडाभर तरी राहील, अशी शक्यता होती पण दोन दिवसांनंतर पुन्हा उघडीप घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.