साताऱ्यात सक्रिय लोकसहभागाची नितांत गरज
घरपट्टीत सूट देण्याच्या नियमाला तिलांजली
पेव्हर ब्लॉकच्या कामामुळे पाणी वाहून जाण्याची भीती
सातारा – साताऱ्यात पाणीबाणीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी उपाययोजना सातारा पालिकेने केवळ कागदी ठराव करून अडगळीत टाकला आहे. मालमत्ता करात दोन टक्के सूट देण्याची पालिकेची घोषणा लोकसहभागाअभावी कागदावरच राहिली आहे. वॉटर हार्वेस्टिंगचा पालिकेचा उपक्रम ऊर्जितावस्थेत येण्यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
नव्या घरबांधणीत हार्वेस्टिंगचा नियम
नव्या घरबांधणीला परवानगी देताना छतावरील पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा असावी, असा राज्य सरकारचा नियम आहे. पालिकेच्यावतीने हा नियम बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाच्यावेळी बंधनकारक केला आहे. मात्र साताऱ्यात अपवाद वगळता या नियमांची अंमलबजावणी झाली आहे. उपनगरातील अनेक घरांसाठी या नियमानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा केल्याचे दाखवण्यात येते. काही प्रमाणात पर्यावरणाच्यादृष्टीने सजग असलेल्या नागरिकांकडून हा प्रयोग राबवला जातो. मात्र घर बांधून झाले आणि महापालिका प्रशासनाकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी क्लीनचीट मिळाली की काही दिवसांनंतर घराच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक घालून छतावरील पावसाचे पाणी साठवण्याऐवजी ते वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला जातो. सातारा शहरात गेल्या पाच वर्षांत तब्बल साडेतीन कोटीची पेव्हर ब्लॉकची कामे झाली. त्यामुळे साताऱ्यात पाणी अडवायचे कसे हा कळीचा मुद्दा आहे.
साताऱ्यात वेगाने पाण्याचे पुनर्भरण न झाल्यास अंर्तगत भूजलस्रोतांचा दुष्काळ संपणारा नाही, मात्र याबाबत पालिका अद्याप पुरेशा गांभीर्याने पावले उचलत नाही हे खेदाची बाब आहे. सर्वांत मोठा स्रोत असलेल्या पावसाचे पाणी योग्यप्रकारे साठवले तर वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा घरच्याघरी तयार होऊ शकतो. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी छतावरचे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया गरजेची आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमांसाठी प्रशासनपातळीवर प्रबोधनाचा जागर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच झाला तर पावसाळ्याच्या चार महिन्यात पाऊस “वाहून’ जाणार नाही. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन अशा पाऊसपाणी बचतीच्या संकल्पना यंदाच्या पावसाळ्यात फळाफुलाला आणण्यासाठी संयोजनाचे बिगुल वाजवण्याच्या तयारीत आहे.
शहराच्या मुख्य वसाहतीत असलेल्या गल्लीबोळांतील घरांच्या परिसरात पाऊसपाणी बचतीची संकल्पना कार्यान्वित होणे सध्या शक्य नसले तरी हा प्रयोग उपनगरातील घरांच्या आवारात होऊ शकतो. छतावरचे पावसाचे पाणी साठवण्यासाठी असलेल्या विविध पद्धती घरगुती पातळीवर वापरल्यास त्यातून वर्षभराची पाण्याची साठवणूक केल्यास सार्वजनिक जलसाठ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळेल.
टॅंकर फेऱ्या वाढल्या पाण्याची श्रीमंती कधीही आटणार नाही अशा पाणीयोजनांनी तुडुंब भरलेल्या साताऱ्यात शहर परिसरात वीस टॅंकरच्या फेऱ्या तर तालुक्यात दिवसाआड याप्रमाणे चाळीस फेऱ्या सुरू असतात. धोम व उरमोडी या दोन्ही धरणांचा तळ दिसू लागल्याने सातारा शहरासह तालुक्यात पाणीबाणी सुरू आहे. गावे गेल्या वर्षी टॅंकरग्रस्त होती. या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर शहरातील पिरवाडी, जगताप वाडी, समर्थ मंदिर चौक, धस कॉलनी, केसकर व मोरे कॉलनी, एसटी कॉलनी, करंजे वसाहत यांसारख्या उपनगरांपासून ते शहराच्या मध्यवसाहतीतही टॅंकर मागवण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. मुळात टॅंकरने पाण्याचा पुरवठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी करावा, असा नियम आहे. मात्र पाणीटंचाईच्या झळांमुळे घरगुती वापरासाठी लागणारे पाणीही टॅंकरने पुरवण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे गावे आणि शहरातील उपनगरांचा बहुतांशी भाग टॅंकरमुक्त होण्यासाठी मदत मिळणार आहे.
पाण्याचे पुनर्भरण थांबले
पावसाचे पाणी जसे साठवण्याची गरज आहे तसेच छतावरील वाहून जाणारे पाणी थेट गटारी आणि नाल्यांमध्ये न मिसळता ते जमिनीत मुरण्याचीही गरज आहे. घरगुती स्तरावर हा प्रयोग होण्यात आवारात घातल्या जाणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकचा अडसर येतो. तर शहरातील रस्त्यांवरही अनेक ठिकाणी सिमेंटचे कॉंक्रिटीकरण व काही प्रभागातील छोट्या गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक घातल्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया जवळपास बंद झाली आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण थांबले आहे. शहरातील 426 बोअरना पाण्याचा पुरवठा करणारी जमिनीअंतर्गत असलेली प्रक्रिया थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.