नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा पराभव होणार आहे. एवढेच नव्हे तर, अमेठीतून खुद्द कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही पराभव पत्करावा लागण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून राहुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोट्या दाव्यांचा आधार घेऊन टीका करत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.
राहुल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. त्यावरून भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल.नरसिंह राव यांनी राहुल यांच्यावर पलटवार केला. राहुल यांचे दावे हास्यास्पद आहेत. देशातील जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा मोदी हवे आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात मोठा दहशतवादी हल्ला घडला नाही.
चौकीदारामुळे जनतेला सुरक्षित वाटत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर कॉंग्रेस सरकारांची कामगिरी निराशाजनक आहे. त्यामुळे त्या पक्षाला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा नकोय, असे राव म्हणाले. नोटाबंदीच्या मुद्द्यावर जनमत आजमावण्याचे आव्हान आम्ही कॉंग्रेसला देतो. जनता आम्हाला अनुकूल असाच कौल देईल. नोटाबंदीमुळे प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली. प्रत्यक्ष करातून मिळणारे उत्पन्न वाढले. तसेच, देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनली, असा दावाही त्यांनी केला.