“राफेल’प्रकरणावरील टिप्पणीबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
नवी दिल्ली – “राफेल’विमानांच्या खरेदीतील गैरव्यवहाराच्या संदर्भाने “चौकीदार चोर है’ या टिप्पणीबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करून भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी या न्यायालयाला वैयक्तिक फायद्यासाठी राजकारणामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी आपल्याविरोधातील अवमान याचिका रद्द करण्याची मागणीही केली आहे. राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील प्रतिक्रिया देताना केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूकीच्या प्रचाराच्या ओघामध्ये आपण “चौकीदार चोर है’ असे वक्तव्य केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याचा आपला अजिबात हेतू नव्हता, असे राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.
राफेलबाबतच्या निकालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे “चौकीदार चोर है’ या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिलच्या सुनावणीमध्ये राहुल गांधींकडून स्पष्टिकरण मागितले होते. त्यानुसार राहुल गांधी यांनी 22 एप्रिल रोजी पहिल्या प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती.